Arshdeep News Record: आशिया कपमध्ये आज अर्शदीप सिंग रचणार नवा विक्रम? 'या' विक्रमापासून फक्त एक बळी दूर

आशिया कप 20225 मध्ये आज टीम इंडियाचा पहिला सामना यूएई विरुद्ध होणार आहे. या सामन्यात अर्शदीप सिंग एका मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे. तो 100 टी-20 आंतरराष्ट्रीय बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरू शकतो.

Arshdeep News Record: आशिया कपमध्ये आज अर्शदीप सिंग रचणार नवा विक्रम? 'या' विक्रमापासून फक्त एक बळी दूर
Arshdeep Singh (Photo Credit - X)

IND vs UAE, Asia Cup 2025: सप्टेंबरपासून आशिया कप 2025चा थरार सुरू झाला असून, अफगाणिस्तानने पहिल्या सामन्यात हॉंगकाँगचा पराभव केला. आज (बुधवारी) दुसरा सामना भारत आणि यूएई यांच्यात होणार आहे. टीम इंडिया आज आपला पहिला सामना दुबईमध्ये खेळणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा एकाच खेळाडूवर असतील, तो म्हणजे भारताचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंग. यूएईविरुद्धचा हा सामना त्याच्यासाठी खूप खास ठरू शकतो, कारण एक बळी घेताच तो भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडेल.

अर्शदीपला हवा फक्त एक बळी

आशिया कप 2025 मध्ये कमाल करण्यासाठी सज्ज असलेला अर्शदीप सिंग सध्या 99 बळींवर आहे. यूएईविरुद्धच्या सामन्यात तो जसाच एक बळी घेईल, तसा तो टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 100 बळी पूर्ण करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरेल. आजपर्यंत कोणत्याही भारतीय गोलंदाजाला हा टप्पा गाठता आलेला नाही. अर्शदीपने 2022 मध्ये पदार्पण केले होते आणि केवळ तीन वर्षांत तो या मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. 100 बळी घेताच तो टी-20 क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा सर्वात यशस्वी गोलंदाज असल्याचे सिद्ध करेल.

टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी

  • अर्शदीप सिंग - 63 सामन्यांत 99 बळी
  • युझवेंद्र चहल - 80 सामन्यांत 96 बळी
  • हार्दिक पांड्या - 114 सामन्यांत 94 बळी
  • जसप्रीत बुमराह - 70 सामन्यांत 89 बळी
  • आर अश्विन - 65 सामन्यांत 72 बळी

टीम इंडियासाठी ‘मॅचविनर’

अर्शदीप सिंग एक खरा मॅचविनर आहे. डेथ ओव्हर्समध्ये त्याची गोलंदाजी भारतासाठी नेहमीच 'ट्रम्प कार्ड' ठरली आहे. अर्शदीप आपल्या अचूक यॉर्कर आणि स्लोअर बाऊंसरने फलंदाजांना चकमा देण्याचे कौशल्य ठेवतो. त्याच्या टी-20 कारकिर्दीची सुरुवात एका मेडन ओव्हरने झाली होती, आणि तेव्हापासून त्याने अनेकदा संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकात त्याने शानदार गोलंदाजी करत 17 बळी घेतले होते आणि भारताला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळेच आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा त्याच्यावर असतील.

पुढील सामने

आशिया कप 2025 मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आपले गट फेरीतील तीन सामने यूएई, पाकिस्तान आणि ओमानविरुद्ध खेळणार आहे. आज त्याचा पहिला सामना आहे, ज्यात 'सूर्या ब्रिगेड' विजयाने सुरुवात करू इच्छिते. आज कर्णधार सूर्यकुमार यादव कोणत्या 11 खेळाडूंसोबत मैदानात उतरेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

(The above story first appeared on LatestLY on Sep 10, 2025 10:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).