Team India (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना उद्या, 24 सप्टेंबर रोजी इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. शुक्रवारी मोहाली येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मोहाली वनडेनंतर आता सगळ्यांचे लक्ष इंदूरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या वनडेकडे लागले आहे. आयसीसी क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने ही एकदिवसीय मालिका टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोघांसाठी महत्त्वाची आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS 2nd ODI Stats And Record Preview: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार रोमांचक सामना, उद्याच्या सामन्यात होऊ शकतात हे मोठे विक्रम; येथे पहा आकडेवारी)

पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीच्या (51/5) घातक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 276 धावांत गुंडाळल्यानंतर टीम इंडियाने 8 चेंडू बाकी असताना 5 गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठले. टीम इंडियासाठी चार फलंदाजांनी अर्धशतके झळकावली, ज्यामध्ये शुभमन गिलने 74, ऋतुराज गायकवाडने 71, केएल राहुलने नाबाद 58 आणि सूरकुमारने 50 धावा केल्या.

टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 टीम बनली आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला विश्वचषकापूर्वी ही गती कायम राखणे आता गरजेचे झाले आहे. एका सामन्यातही पराभव टीम इंडियाचे मनोधैर्य खचू शकतो. इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारा दुसरा एकदिवसीय सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. वृत्तानुसार, दुसऱ्या वनडे सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला जाऊ शकतो.

पहिल्या वनडेत खराब गोलंदाजी करणाऱ्या शार्दुल ठाकूरला विश्रांती दिली जाऊ शकते. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात प्राणघातक गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद शमीचा शार्दुल ठाकूरच्या जागी संघात समावेश करण्यात आला आहे. शार्दुल ठाकूरने गोलंदाजीत 10 षटकात 78 धावा दिल्या. शार्दुल ठाकूरला एकही विकेट घेता आली नाही. मात्र शार्दुल ठाकूरने बांगलादेशविरुद्ध आशिया चषक सुपर-4 मध्ये गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली होती. शार्दुल ठाकूरने 65 धावांत 3 बळी घेतले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली होती. विराट कोहली, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या दुसऱ्या वनडेत खेळणार नाहीत. हे दिग्गज तिसऱ्या वनडेत पुनरागमन करतील. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फिरकीपटूंचे स्थान अबाधित राहू शकते. आर अश्विनने 10 षटकात 47 धावा देत 1 बळी घेतला, पण त्याची गोलंदाजी किफायतशीर होती.

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 वनडे मालिकेतील दुसरा सामना 24 सप्टेंबर रोजी इंदूरमध्ये होणार आहे. तर या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये होणार आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 पासून खेळवले जातील. खरे तर आयसीसी विश्वचषकापूर्वी ही मालिका टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियासाठी खूप महत्त्वाची मानली जात आहे.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हे असू शकते प्लेइंग इलेव्हन: ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.