
टीम इंडिया सध्या क्रिकेट विश्वातील मजबूत संघापैकी एक आहे. पण, टीम इंडियामधील एक कमकुवत बाजूने संघाला मुश्किलीत टाकले आहे. आणि ती म्हणजे चौथ्या क्रमांकावरील फलंदाज. 2015 विश्वचषकनंतर टीम इंडियाने चौथ्या क्रमांकावर अनेक फलंदाजांना उतरवून बघितले आहे, पण अजूनही त्यांना या नंबरवर बॅटिंग करण्यासाठी उपयुक्त खेळाडू मिळाला नाही. शिवाय, काही महिन्यांपासून रिषभ पंत (Rishabh Pant) याला या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी तयार केले जात आहे पण, त्याने देखील निराश केले आहे. अशा परिस्थितीत, भारतीय संघातून मागील वर्षापासून बाहेर राहिलेल्या सुरेश रैना (Suresh Raina) याने या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आपली दावेदारी दर्शवली आहे. (Ind Vs SA 3rd T20 Match: रिषभ पंत याच्या अडचणी वाढल्या; भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-20 सामना ठरु शकतो अखेरचा)
वनडे आणि टी-20 च्या भारतीय संघात तो अजूनही नंबर 4 वर फलंदाजी करू शकतो असा रैनाचा विश्वास आहे. रैनाने मागील वर्षी इंग्लंडविरुद्ध भारतासाठी अखेरचा सामना खेळला होता आणि आता पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकआधी पुन्हा भारतीय संघात (Indian Team) पुनरागमन करण्याच्या तो प्रयत्नात आहे. गुरुवारी रैना 'द हिंदू' ला सांगितले की, "मी भारतासाठी नंबर 4 वर फलंदाजी करू शकतो. यापूर्वी मी या क्रमांकावर फलंदाजी केली आहे आणि चांगली कामगिरीही केली आहे. पुढील दोन वर्षात दोन विश्वचषक खेळले जाणार आहेत आणि मी एका संधीच्या शोधत आहे."
भारतीय संघातील नंबर 4 वरील स्थान बर्याच काळापासून चर्चेचा विषय ठरला आहे. काही काळ अंबाती रायडू याला नंबर 4 वर फलंदाजीवरून लागल्यावर निवडकर्त्यांनी विजय शंकर याला विश्वचषकसाठी टीममध्ये निवडले. विजयला दुखापत झाल्यावर रिषभ पंत याला संधी देण्यात आली, पण त्याने देखील निराश केले. विश्वचषकनंतर वेस्ट इंडिज दौरा आणि आता दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पंतला अपेक्षित कामगिरी करता अली नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांकडून टीका केली जात आहे, तर अन्य काही जाणकार पंतला पूर्णपणे प्रशिक्षण देऊन त्याच्या दबाव आणण्यापेक्षा पाठिंबा देण्याची मागणी करत आहे.