Suresh Raina Relatives Attacked: सुरेश रैनाच्या नातेवाईकांच्या खून प्रकरणाचा लागला छडा, पंजाब पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीतील 3 सदस्यांना अटक
सुरेश रैना (Photo Credits: Instagram)

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Captain Amarinder Singh) यांनी बुधवारी क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) याच्या नातलगातील हल्ल्याचा आणि खून प्रकरणाचा निकाल लागला असल्याचे जाहीर केलं. दरोडेखोर-गुन्हेगारांच्या आंतरराज्यीय टोळीतील तीन सदस्यांना पंजाब पोलिसांकडून (Punjab Police) अटक झाल्याने प्रकरणाचा छडा लागल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री म्हणाले. अन्य 11 आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती डीजीपी दिनकर गुप्ता यांनी या प्रकरणातील अटक संदर्भात दिली. "क्रिकेटर सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर झालेल्या हल्ल्या आणि खून प्रकरणातील दरोडेखोर-गुन्हेगारांच्या आंतरराज्यीय टोळीतील तीन सदस्यांच्या अटकेमुळे हा प्रश्न सुटला आहे. अन्य अकरा आरोपींना अटक होणे बाकी," असे राज्य सरकारने आपल्या निवेदनात म्हटले. पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात रैनाचे 58 वर्षीय काका, अशोक कुमारची हत्या झाली होती. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील चार जण जखमी झालेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पंजाबच्या पठाणकोटमधील थारियाल गावात 20 ऑगस्ट दरम्यान घडली. (Suresh Raina Workout for IPL: सुरेश रैनाने पुन्हा सुरु केला सराव, 'तुझ्याशिवाय CSK ची कल्पना करू शकत नाही' म्हणत युजर्सने परतण्याचे केले आवाहन)

पठाणकोटच्या माधोपूरजवळील थारियाल गावात ते अशोक कुमार यांच्या घरात घुसले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केला. हल्ल्याच्या वेळी सर्व जण आपल्या घराच्या गच्चीवर झोपले होते. अशोक यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. रैनाची आत्या आशा रानी यांना गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेननंतर रैनाने युएई येथे होणाऱ्या आयपीएलमधून माघार घेतली आणि भारत परतला. घटनेच्या  दिवसांनंतर रैनाने ट्विट केले आणि पंजाब पोलिसांकडून मदतीचे आवाहन केले. या हल्ल्यात रैनाच्या काकांपाठोपाठ आता त्याच्या चुलत भावाचाही मृत्यू झाल्याची माहिती त्याने ट्विटमधून दिली आहे.

"पंजाबमध्ये माझ्या कुटुंबाबरोबर घडलेली घटना भयंकर आहे. हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात माझ्या काकांचा जागीच मृत्यू झाला तर माझ्या आत्याला आणि चुलत भावाला गंभीर दुखापत झाली आहे. उपचारादरम्यान काल रात्री माझ्या भावाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. माझ्या आत्याची प्रकृती चिंताजनक असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे," रैनाने ट्विट करुन म्हटलं. घटनेनंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी आयजीपी बॉर्डर रेंज अमृतसर अंतर्गत एसएसपी पठाणकोट, एसपी इन्व्हेस्टिगेशन आणि डीएसपी धार कलान सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. दुसरीकडे, हल्ल्यात जखमी झालेल्या अन्य दोघांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे.