देश सांभाळता येत नाही, तर पाकिस्तान काश्मीर काय सांभाळणार?- शाहीद आफ्रिदी
पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी (Photo Credit: twitter/osmanuzair_pak_crik)

पाकिस्तानला स्वत:चा देश सांभाळता येत नाही, ते काश्मीर काय सांभाळणार?, अशी कठोर सवाल खुद्द पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने केला आहे. पत्रकार परिषदेत तो बोलत होता. आफ्रिदीच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत त्याने पाकला काश्मीर सांभाळणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानला देशातील नागरिकांना सांभाळणे कठीण जाते. तर ते काश्मीर काय सांभाळणार, असा प्रश्न आफ्रिदीने उपस्थित केला आहे.

पुढे काश्मीर प्रकरणावर तो म्हणाला की, "पाकिस्तानला काश्मीर नकोय. भारतालाही काश्मीर देऊ नका. काश्मीर हा एक स्वतंत्र देश व्हावा. त्यामुळे कमीत कमी माणूसकी तरी जिवंत राहिल. लोकांचे विनाकारण जाणारे बळी तरी थांबतील."

आफ्रिदीने यापूर्वीही काश्मीरवर वक्तव्य केलं होतं. त्यावेळेस त्याने भारतावर टीका केली होती. एप्रिलमध्ये भारतीय सैन्याने 13 अतिरेक्यांचा खात्मा केल्यावर आफ्रिदीने ट्विटरवरुन अनेक सवाल उपस्थित केले होते. त्यावर अनेक भारतीय खेळाडू, सेलिब्रेटी आणि राजकर्त्यांनी टीका केली होती.