Rohit Sharma Injury Update: रोहित शर्माची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वनडे आणि टी-20 मध्ये का निवड झाली नाही? सौरव गांगुली यांनी सांगितलं कारण
रोहित शर्मा (Photo by Alex Davidson/Getty Images)

Rohit Sharma Injury Update: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 13च्या किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध एका साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखापत झाली ज्यामुळे सुरुवातीला त्याची आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India Tour of Australia) निवड झाली नाही, पण अखेरीस त्याला भारताच्या कसोटी संघात (Indian Cricket Team) स्थान मिळाले मात्र वनडे आणि टी-20 मालिकेसाठी टीममधून वगळण्यात आलं. यानंतर पहिल्यांदा रोहितची निवड न केल्याबद्दल बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी उघडपणे भाष्य केले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तंदुरुस्तीमुळे रोहितला संघात स्थान मिळालं नाही. यानंतर रोहित मुंबई इंडियन्ससाठी मैदानावर परतला, त्यानंतरही त्याची संघात निवड न होण्याची बरीच चर्चा रंगली. मुंबई इंडियन्सला पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनवणाऱ्या रोहितने फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 68 धावांचा डाव खेळला, तरी रोहित फक्त 70 टक्के तंदुरुस्त असल्याचे गांगुलीचे मत आहे. ('रोहित शर्मा एम एस धोनी आणि सौरव गांगुली यांचे मिश्रण', इरफान पठाण याचे मुंबई इंडियन्स कर्णधाराच्या लीडरशिपचे कौतुक)

रोहितच्या दुखापतीविषयी बोलताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ‘द वीक’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की,‘ रोहित अजूनही 70 टक्के [तंदुरुस्त] आहे. स्वत: रोहितला का विचारत नाही? म्हणूनच अद्याप वनडे आणि टी-20 सामन्यांसाठी त्याला निवडले गेले नाही. त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे, ’माजी भारतीय कर्णधाराने म्हटले. दरम्यान, पुनर्वसनानंतर रोहित शर्मा कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात सामील होईल जी 17 डिसेंबरपासून अ‍ॅडिलेड येथे सुरु होत आहे. इशांत शर्मा हा दुसरा खेळाडू आहे, ज्याला संघातून वगळण्यात आले आहे, परंतु जर त्याने त्याची फिटनेस सिद्ध केली तर कसोटी संघात त्याचा समावेश केला जाऊ शकेल. भारतीय संघ गुरुवारी सिडनी येथे पोहोचला असून आता दोन आठवड्यांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करत आहेत.

जेव्हा राष्ट्रीय निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी संघ जाहीर केला तेव्हा रोहितला अपात्र असल्याचे वर्णन करून कोणत्याही संघात स्थान दिले नव्हते. यावर बरीच टीका झाली होती कारण बोर्डाच्या घोषणेनंतर रोहित नेटमध्ये सराव करताना दिसला होता. त्यानंतर रोहितने मुंबई इंडियन्सचे शेवटचे तीन सामने खेळले ज्यामध्ये अंतिम लीग  सामना, क्वालिफायर आणि अंतिम सामन्याचा समावेश होता. आयपीएल फायनलच्या एक दिवस अगोदर निवड समितीने रोहितशी चर्चा केल्यानंतर त्याला वनडे आणि टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली जेणेकरून तो आपली संपूर्ण फिटनेस परत मिळवू शकेल.