मुंबई: हिंदू दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच 'गुढीपाडवा' आज, १८ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्रभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर घराघरांत उंचावलेली गुढी आणि पारंपारिक वेशभूषेतील नागरिक असे चित्र आज पहावयास मिळत आहे. नवीन संकल्पांची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. गुढीपाडवा हा केवळ सण नसून तो विजयाचे प्रतीक मानला जातो. पौराणिक कथेनुसार, याच दिवशी प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून अयोध्येत परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील प्रजेने गुढ्या उभारल्या होत्या. तसेच, याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, अशीही मान्यता आहे.
गुढीपाडव्याचे विशेष शुभेच्छा संदेश



उत्सवाची जय्यत तयारी
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आज भव्य 'स्वागत यात्रा' काढण्यात येत आहेत. मुंबई, पुणे आणि नाशिक यांसारख्या शहरांत सकाळपासूनच ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका निघाल्या आहेत. महिलांनी नऊवारी साडी आणि पुरुषांनी कुर्ता-पायजमा अशा पारंपारिक वेशभूषेत या सोहळ्यात सहभाग नोंदवला आहे.
बाजारपेठेत तेजी
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने आजच्या दिवशी सोने खरेदी, नवीन वस्तू किंवा घर खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल आहे. यामुळे सराफा बाजार आणि रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी उलाढाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाकडून गर्दीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.