ICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना
रवी शास्त्री (Photo Credits: Getty Images)

इंग्लंड (England) व वेल्स (Wales) येथे 30 मे पासून खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक (ICC World Cup 2019) सामन्यांसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा झाली आणि सोबतच क्रिकेट विश्वात खेळाडूंच्या निवडीवर चर्चा सुरु झाल्या. अंबाती रायडू (Ambati Raydu), रिषभ पंत (Rishabh Pant) यांसारख्या खेळाडूंच्या मागील सामन्यांमंधील उत्तम खेळीला डावलून त्यांना संघात न घेतल्याने अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी या बद्दल बोलताना, "विश्वचषक संघात १६ खेळाडूंची निवड केली असता खेळाडू आणि चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले नसते", असे मत मांडले.या सोबतच संघाच्या निवड प्रक्रियेत स्वतः सहभागी नसून काही सूचना द्यायच्या झाल्यास त्या कर्णधाराच्या मार्फत मांडत असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. ICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप 2019 'च्या कोहली ब्रिगेड मध्ये महाराष्ट्रातील 'रोहित शर्मा' आणि 'केदार जाधव'चे स्थान पक्के

विश्वचषकाचा सामना हा एक ते दीड महिन्याच्या कालावधी मध्ये खेळला जातो अशा वेळी केवळ १५ खेळाडूंवर संपूर्ण दबाव टाकणे धोक्याचे आहे, शिवाय इंग्लंड मधील हवामान व क्रिकेटच्या मैदानांची स्थिती पाहता अपघातांचा धोका देखील संभवतो. या परिस्थितीत राखीव खेळाडूंची सर्वात जास्त गरज भासते त्यामुळे ज्यांची निवड झालेली नाही अशा खेळाडूंनी नाराज न होता कोणत्याही वेळी येऊ शकणाऱ्या संधी साठी तयार राहायला हवे असे आवाहन देखील रवी शास्त्रीनीं बोलताना केले.

या सोबतच वर्ल्डकप संघात ४थ्या क्रमांकावर नेमलेल्या विजय शंकर विषयी माहिती देताना सुरवातीचे तीन खेळाडू हे निश्चित असून त्यानंतरच्या स्तरावर परिस्थिती नुसार बदल करण्यात येतील असे विधान त्यांनी केले.

काही दिवसांपूर्वी विजय शंकर ऐवजी अंबाती रायडू याला ४थ्या क्रमांकावर खेळवण्याची शक्यता कर्णधार विराट कोहली याने वर्तवली होती. मात्र १५ खेळाडूंच्या संघ निवडी नंतर रायडू, पंत आणि नवदीप सायनी यांची राखीव खेळाडूंमध्ये नेमणूक करण्यात आली आहे.

येत्या ३० मे पासून सुरूहोणारा विश्वचषक सामना 14 जुलै पर्यंत खेळलं जाणार आहे. या सामन्यांच्या पूर्वी भारत विरुद्ध न्यूझीलँड व भारत विरुद्ध बांगलादेश असा सराव सामना क्रमशः  25 व 28 मे ला खेळवण्यात येणार आहे.

विश्वचषक सामन्यातील भारताची पहिली मॅच 5 जून रोजी साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध  साऊथम्पटन येथे रंगणार आहे