BCCI कडून टीम इंडिया च्या मुख्य प्रशिक्षकासाठी वयाची अट, किमान दोन वर्षांचा आंतरराष्ट्रीय अनुभव असावा
भारतीय क्रिकेट संघ (Photo Credit : BCCI/Twitter)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय (BCCI) ने क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफच्या पदाकरिता अर्ज मागवले आहेत. सध्याचे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि त्यांच्या सहकारी यांचा बीसीसीआयबरोबरच करार विश्वचषकनंतर संपला आहे. मात्र, भारतीय संघाचा आगामी वेस्ट इंडिज (West Indies) दौरा बघता शास्त्री, संजय बांगर आणि आर. श्रीधर (R Sridhar) यांचाही कार्यकाळ 45 दिवसांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजसोबतच्या मालिकेनंतर भारतीय संघाला नवीन प्रशिक्षक मिळणार आहे. इंग्लंडमध्ये आयोजित विश्वचषकच्या सेमीफाइनलमध्येच बाहेर पडल्यानंतर शास्त्री आणि त्यांच्या घेतलेल्या निर्णयावर टीका केली जात आहे. पण, भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी बीसीसीआयने काही अटी नेमल्या आहेत. (हे 5 माजी खेळाडू घेऊ शतकात टीम इंडिया मध्ये मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांची जागा)

टीम इंडियाच्या नवीन कोचसाठी बीसीसीआयकडून वयाची अट घातली घेली आहे. मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय 60 वर्षांखाली असावे आणि त्याला दोन वर्षांचा आंतरराष्ट्रीय संघाला मार्गदर्शन केल्याचा अनुभव असावा अशी अटही घालण्यात आली आहे. प्रमुख प्रशिक्षकासह, फलंदाजीचे प्रशिक्षक, गोलंदाजीचे प्रशिक्षक, क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक, फिझिओ, स्ट्रेंथ अँड कन्डिशनिंग प्रशिक्षक आणि अॅडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर या पदांसाठी देखील बीसीसीआयने अर्ज मागविले आहेत. या सगळ्या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

2017 मध्ये बीसीसीआयने माजी भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्या राजीनाम्यानंतर शास्त्री यांची प्रशिक्षकपदी नेमणूक केली. तेव्हा अर्जदारांसाठी नऊ अटी ठेवण्यात आल्या होत्या. पण यंदा ही संख्या तीनवर आणण्यात आली. दरम्यान, या अटी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या प्रशिक्षकांबाबतही लागू होणार आहेत.