India Tour of England 2021: लढतीपूर्वी कठोर निर्बंध, भारतीय संघ 24 दिवस राहणार क्वारंटाईन; पहा टीम इंडिया क्रिकेटपटूंसाठी असे आहेत नियम
टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

India Tour of England 2021: कोविड-19 (COVID) चा धोका भारतासाठी नवीन आव्हाने निर्माण करत असताना, क्रिकेटपटूंसाठी प्रोटोकॉल दिवसेंदिवस कठीण होत जात आहेत. टीम इंडिया  (Team India) 2 जून रोजी युनायटेड किंगडम (United Kingdom) दौर्‍यावर येणार आहे आणि त्यांच्या स्पर्धेपूर्वीचा क्वारंटाईन कालावधी 19 मे पासून सुरू होणार आहे. इंग्लंड (England) दौऱ्यावर भारतीय संघ (Indian Team) पहिले 18 जूनपासून न्यूझीलंड विरोधात सुरु होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. मागील काही आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या उलट, आगामी दौऱ्यासाठी मार्गदर्शक सूचनांनुसार ‘विराटसेने’ला कठोर प्रक्रियेतून जावे लागणार आहेत. या स्पर्धेपूर्वी अंतिम सामन्यासाठी संघ 24 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करेल. बीसीसीआयच्या (BCCI) भारतीय संघासाठी इंग्लंड-पूर्व दौर्‍यासाठी मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे आहेत. (India Tour of England 2021: टीम इंडियामध्ये इंग्लंड विरोधात या 3 खेळाडूंना स्थान मिळणं कठीण, कदाचित बेंचवर बसून काढतील संपूर्ण दौरा)

  • संक्रमण रोखण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने 19 मेपासून मुंबईत खेळाडूंना क्वारंटाईन केले जाईल. मात्र शहरात राहणाऱ्या खेळाडूंना सूट देण्यात आली आहे, बीसीसीआयने त्यांना घरी क्वारंटाईन राहण्याची परवानगी दिली आहे, तरी ते एक कठीण क्वारंटाईन असेल. मुंबईत राहणारे खेळाडू 24 मे रोजी बबलमध्ये दाखल होऊ शकतात.
  • पुरुष व महिला संघ युकेला रवाना होण्यापूर्वी सर्व खेळाडूंच्या तीन कोविड टेस्ट घेतल्या जातील. तथापि, खेळाडू त्यांच्या कुटुंबियांसह प्रवास करू शकतील की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही आहे. कुटुंबातील सदस्यांच्या प्रवासाबद्दल इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाकडून बीसीसीआयला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
  • खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांना व सहाय्यक कर्मचार्‍यांना बीसीसीआयने मुंबई बायो-बबलचा भाग बनण्याची परवानगी दिली आहे, परंतु इंग्लंड दौर्‍यासाठी अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
  • साऊथॅम्प्टनमध्ये आगमन झाल्यानंतर टीम इंडियाला पुन्हा एकदा स्वत:ला क्वारंटाईन करणे आवश्यक असेल. यावेळी 10 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी असेल. तथापि, खेळाडूंना काही क्षमतेने प्रशिक्षणाची परवानगी दिली जाईल.

    दरम्यान, कोरोना व्हायरसच्या या काळात भारतीय क्रिकेटपटूंसाठी अनेक आव्हाने आहेत. आयपीएल 2021 चा हंगाम अकाली स्थगित झाल्यानंतर अलीकडेच घरी परतल्यानंतर बर्‍याच खेळाडूंना घरी दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळाली नव्हती आणि आता ते दुसर्‍या बायो-बबलमध्ये दाखल होण्यास तयार आहेत. शिवाय, इंग्लंडचा यंदाचा दौरादेखील लांबचा असणार असून या संघाला तब्बल साडेतीन महिने घराबाहेर रहावे लागणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यानंतर इंग्लंड विरोधात पाच सामन्यांची कसोटी मालिका ऑगस्ट महिन्यात सुरु होणार आहे. जुलै महिन्यात संघाला ब्रेक मिळणार असला तरी त्यांना यूके येथेच राहावे लागणार आहे.