चेन्नई: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मधील सुपर 8 फेरीचा थरार आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. आज, 26 फेब्रुवारी रोजी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर भारत आणि जिम्बाब्वे यांच्यात महत्वपूर्ण सामना खेळला जात आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 76 धावांनी पराभूत केल्यामुळे भारताचा नेट रन रेट उणे (-3.800) झाला आहे. त्यामुळे आज केवळ विजयच नाही, तर मोठ्या फरकाने विजय मिळवणे टीम इंडियासाठी गरजेचे आहे.
चेपॉकची खेळपट्टी आणि फलंदाजांचे आव्हान
चेन्नईची खेळपट्टी पारंपरिकपणे फिरकीपटूंना मदत करणारी मानली जाते. मात्र, या स्पर्धेत येथे फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असून 180-190 धावांचे लक्ष्य गाठणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भारतासाठी सलामीची जोडी आणि मधल्या फळीतील फलंदाजांचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघ आज आपल्या फलंदाजीच्या रणनीतीत काही बदल करण्याची शक्यता आहे.
जिम्बाब्वेचा 'सरप्राईज' देण्याचा प्रयत्न
जिम्बाब्वेने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वांना चकित केले आहे. त्यांनी साखळी फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करून सुपर 8 मध्ये स्थान मिळवले. कर्णधार सिकंदर रझा आणि वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझाराबानी भारताच्या अडचणी वाढवू शकतात. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून पराभूत झाल्यानंतर जिम्बाब्वेचा संघही या स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे स्कोअरकार्ड
हवामान आणि नाणेफेकीचे महत्त्व
चेन्नईमध्ये आज संध्याकाळी हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता असून पावसाचे कोणतेही संकट नाही. दमट वातावरणामुळे खेळाडूंचा कस लागेल. रात्रीच्या वेळी दव पडण्याची (Dew Factor) दाट शक्यता असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. मात्र, भारतीय संघाला नेट रन रेट सुधारायचा असल्यास प्रथम फलंदाजी करून मोठे लक्ष्य उभारणे फायदेशीर ठरू शकते.
संभाव्य प्लेइंग-11
भारताच्या ताफ्यात संजू सॅमसनचे पुनरागमन होऊ शकते, ज्यामुळे फलंदाजीला अधिक खोली मिळेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्यावर मुख्य जबाबदारी असेल, तर फिरकीची धुरा कुलदीप यादव आणि अक्षर पटेल सांभाळतील.