IND vs NZ WTC Final 2021 Day 3: सलामीवीर डेव्हन कॉनवेचे अर्धशतक, न्यूझीलंड 2 बाद 101 धावा; तिसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाकडे 116 धावांची आघाडी
डेव्हन कॉनवे (Photo Credit: Twitter/BLACKCAPS)

IND vs NZ WTC Final 2021 Day 3: साऊथॅम्प्टनच्या (Southampton) हॅम्पशायर बाउल येथे भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात सुरु असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनलच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळे लवकर संपुष्टात आला आहे. तिसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाच्या (Team India) पहिल्या डावातील 217 धावांच्या प्रत्युत्तरात किवी संघाने 49 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 101 धावा केल्या आहेत  आणि भारताकडे अद्याप 116 धावांची आघाडी आहे. किवी संघाने टॉम लाथम आणि डेव्हन कॉनवेच्या (Devon Conway) रूपात दोन विकेट गमावल्या. लाथमने 30 धावा केल्या तसेच कॉनवेने अर्धशतक पूर्ण केले व 54 धावा केल्या. तसेच कर्णधार न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) 12 धावा करून मैदानात टिकून होता. विल्यमसनला साथ देण्यासाठी रॉस टेलर देखील मैदानात उतरला होता. दुसरीकडे, भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि इशांत शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. (IND vs NZ WTC Final 2021: फायनल सामन्यात Virat Kohli ने लावला पंजाबी तडका, सोशल मीडियावर व्हायरल होतोय जबराट डान्सचा Video)

भारताचा पहिला डाव 217 धावांवर संपुष्टात आणण्यात किवी संघाचा 6 फुट 8 उंचीचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने महत्वाची भूमिका बजावली. जेमीसनने कर्णधार विराटसह रिषभ पंत (Rishabh Pant) आणि सुरुवातीला हिटमॅन रोहित शर्माचा (Rohit Sharma) अडथळा दूर केला. तसेच त्यानंतर त्याने जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा यांना एकात ओव्हरमध्ये माघारी धाडलं. जेमीसनने एकाच डावात भारताचे 5 गडी बाद केल्यामुळे भारताचा डाव फक्त 217 धावांवर संपुष्टात आणला. भारतीय संघाकडून उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 49 धावा केल्या तर विराटने 44 आणि रोहित शर्माने 34 धावांचे छोटेखानी योगदान दिले. त्यांनतर लाथम-कॉनवेच्या जोडीने सावध सुरुवात करत कोणतेही जोखीम पत्करले नाही. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना सुरुवातील विकेट घेण्यात अपयश आले पण दिवसाचा अखेरच्या सत्रात अश्विनने लाथमला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे तर किवी संघाने अंतिम-11 मध्ये फिरकीपटूचा समावेश केलेला नाही आहे तर भारतीय इलेव्हनमध्ये रवींद्र जडेजा व अश्विन असे दोन आघाडीचे स्पिन गोलंदाज आहेत. विशेष म्हणजे या दोघांना बॅटने कमाल दाखवता आली नाही त्यामुळे आता त्याची कसर ते चेंडूने पूर्ण करण्यासाठी उत्सुक असतील.