IND vs ENG 3rd Test 2021: डे-नाईट टेस्टमध्ये इशांत शर्माचा कमाल, 100 वा कसोटी सामना खेळणारा ठरला 11वा भारतीय क्रिकेटर, पहा संपूर्ण लिस्ट
ईशांत शर्मा (Photo Credit: IANS)

IND vs ENG 3rd Test 2021: जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर यजमान भारत (India) आणि इंग्लंड (England) संघ आमने-सामने आले आहेत. या सामन्यात टीम इंडियाने इशांत शर्माला (Ishant Sharma) प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम ठेवले आणि भारतीय गोलंदाज 100वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला. इशांत आता 100 कसोटी सामने खेळणारा भारताचा 11वा तर फक्त दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज बनला ज्याने कारकिर्दीत हा मैलाचा दगड गाठला आहे. यासह, इशांत 100 कसोटी सामने खेळणारा आशियातील चौथा वेगवान गोलंदाज ठरला. यापूर्वी, कपिल देवने (Kapil Dev) वेगवान गोलंदाज म्हणून सर्वाधिक 132, श्रीलंकेचा चमिंडा वास 111, वसीम अक्रम 104कसोटी सामने खेळले आहेत. या खास दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गृहमंत्री अमित शहा यांनी ईशांतला भेट देत विशेष सन्मान केला. (IND vs AUS 3rd Test 2021: कोहलीच्या निशाण्यावर MS Dhoni याचा 'विराट' कॅप्टन्सी रेकॉर्ड, इतिहास निर्मितीपासून फक्त एक पाऊल दूर)

भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामन्यांचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर असून मास्टर-ब्लास्टरने 200 कसोटी सामने खेळले आहेत. यानंतर राहुल द्रविडने 163 सामने, व्हीव्हीस लक्ष्मणने 134, माजी कर्णधार अनिल कुंबळे 132, कपिल देव 131, सुनील गावस्कर 125, दिलीप वेंगसरकर 116, सौरव गांगुली 113, हरभजन सिंहने 103 आणि वीरेंद्र सेहवागने 103 सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे, भारतासाठी वेगवान गोलंदाज म्हणून फक्त माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार कपिल देव यांनी 100 हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. दुसरीकडे, जगभरात आतापर्यंत 69 क्रिकेटर्स 100 कसोटी सामने खेळले आहेत आणि सचिनने सर्वाधिक सामन्यांचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

इशांतने 2007 मध्ये बांग्लादेशविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्यानंतर त्याने झहीर खानबरोबर जोडी बनवत अनेक वेळा टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. इशांतने टीम इंडियासाठी 80 वनडे आणि 16 टी-20 सामने देखील खेळले आहेत. इशांत कसोटी कारकीर्दीत 300 हून अधिक विकेट घेणारा भारताचा तिसरा वेगवान गोलंदाज आहे. इशांतपूर्वी केवळ कपिल देव आणि झहीर खान यांना हा पराक्रम केला आहे. कपिलने आपल्या कारकीर्दीत एकूण 434 विकेट घेतल्या आहेत तर झहीरने एकूण 311 गडी बाद केले आहेत. या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर जवगल श्रीनाथ आहेत ज्यांनी एकूण 67 कसोटी सामन्यांमध्ये 231 विकेट घेतल्या आहेत.