ICC World Test Championship: आर अश्विन याला पहिला मान; जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत ‘असा’ पराक्रम करणारा बनला नंबर 1 गोलंदाज
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

Most wickets in WTC: भारताचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याचे कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) सुवर्ण कामगिरी सुरूच ठेवली आहे. अश्विनने श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 12 बळी घेतले. यासोबत आता कसोटी क्रिकेटमध्ये त्याने एकूण 442 विकेट्स घेतल्या आहेत आणि सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो आठव्या क्रमांकावर सरकला आहे. याशिवाय बेंगलोर येथे श्रीलंकाविरुद्ध पिंक-बॉल कसोटी (Pink-Ball Test) सामन्यातून त्याने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. भारतीय स्टार ऑफस्पिनरने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) मध्ये एका विशिष्ट कामगिरीची नोंद केली आहे. अश्विनच्या नावावर आता WTC मध्ये सर्वाधिक 100 विकेट्स आहेत. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंतच्या दोन्ही कालावधीत विकेट्सचे शतक पूर्ण करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. (IND vs SL: कर्णधार रोहित शर्मा याचा असा विक्रम जो एमएस धोनी-विराट कोहली पण कधीच करू शकले नाहीत)

अश्विनने जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या 2019-21 आवृत्तीत सार्वधिक 71 विकेट घेतल्या होत्या. तर 2021-23 च्या आवृत्तीत त्याने आतापर्यंत 7 सामन्यांच्या 14 डावांत 29 विकेट्स घेतले आहेत. अशाप्रकारे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत अश्विनच्या एकूण बळींची संख्या 100 झाली आहे. अश्विननंतर, ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कमिन्सने आतापर्यंत 93 गडी बाद केले आहेत. ऑस्ट्रेलिया संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत असून कमिन्स यादरम्यान बळीचे शतक पूर्ण करेल असे अपेक्षित आहे. याशिवाय इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड 83 विकेट्ससह तिसऱ्या, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साउदी 80 विकेट्ससह चौथ्या, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 74 विकेटसह पाचव्या तर ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनही तितक्याच विकेट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, एका कसोटी मालिकेत अश्विनने भारतासाठी सर्वाधिक 12 बळी घेण्याची ही 12 वी वेळ ठरली आहे. त्याने भारतात संघासाठी 18 कसोटी मालिका खेळल्या आहेत. अश्विन 86 सामन्यात भारतासाठी 442 कसोटी विकेट घेणारा दुसरा यशस्वी गोलंदाज आहे. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत त्याने माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांना एलिट यादीत मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावला.