
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (World Test Championship) पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचं पुढचं मिशन वेस्ट इंडिज (West Indies) दौरा आहे. आगामी दौऱ्यावर टीम इंडिया (Team India) दमदार पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा 12 जुलैपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ पुढील महिन्यात दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) कसोटी मालिकेत निवडीसाठी उपलब्ध असेल.
काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात होता की टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मासह अनेक वरिष्ठ खेळाडूंना वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करेल, असे बोलले जात होते. पण आता बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्तांचे खंडन केले आहे. (हे देखील वाचा: Asia Cup 2023: आशिया चषक संदर्भात झका अश्रफ यांचे धक्कादायक विधान, भारत - पाकिस्तान सामना होणार की नाही प्रश्न उपस्थित)
मालिकेला मुकणार हे खेळाडू
दुखापत केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघाचा भाग असणार नाहीत. मात्र, चेतेश्वर पुजारालाही फटका बसू शकतो. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त असून निवडीसाठी उपलब्ध आहे. रोहित शर्माला चांगला ब्रेक मिळाला. त्यामुळे वर्कलोड मॅनेजमेंटचीही चिंता नाही. वेस्ट इंडिज मालिकेत फक्त रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल.
सर्फराज खान आणि मुकेश कुमार यांना मिळू शकते संधी
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या मुंबईच्या सरफराज खानला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळू शकते. सरफराज खानशिवाय वेगवान गोलंदाज मुकेश कुमारचाही संघात समावेश होऊ शकतो. जरी, मुकेश कुमार याआधी देखील संघात सामील झाला आहे, परंतु अद्याप त्याचे पदार्पण झालेले नाही.
हार्दिक पांड्या कसोटी संघात करू शकतो पुनरागमन
निवड समिती अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला कसोटी संघात परत आणण्यासाठी योजना तयार करत आहेत. मात्र, त्याचा अंतिम निर्णय हार्दिक पांड्यावरच असेल. दुसरीकडे, टीम इंडियाचे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते.