आयपीलएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात BCCI शांत; श्रीशांत याच्यावरील आजीवन बंदी हटवून 7 वर्षांवर आणली
श्रीशांत (Photo Credits: Facebook)

स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाने वेढलेले भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीशांत (S Sreesanth) याच्यावर घातलेली आजीवन बंदी बीसीसीआयने (BCCI) आता सात वर्षांवर आणली आहे. बीसीसीआय लोकपाल डीके जैन (DK Jain) यांनी श्रीशांतच्या मागील आचरण लक्षात घेत हा निर्णय घेतला आहे. श्रीशांतने आपल्या शिक्षेची सहा वर्षे आधीच पूर्ण केली आहेत. त्यामुळे आता श्रीशांतवरील बंदी 13 सप्टेंबर 2020 रोजी संपेल. श्रीशांवर 13 सप्टेंबर 2013 दिवशी आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याआधी मार्च 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने आयपीएल स्पॉट फिक्सिंग (IPL Spot-Fixing) प्रकरणात श्रीसंतवरील आजीवन बंदी काढून टाकली होती. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, बीसीसीआयला शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार आहे. श्रीशांतचे बोलणे ऐकून 3 महिन्यांत शिक्षेचे आदेश देण्याचे आदेश कोर्टाने बीसीसीआयला दिले होते.

जुलै 2015 मध्ये श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांच्यासह स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील सर्व 36 आरोपींना पटियाला हाऊस कोर्टाने फौजदारी खटल्यातून निर्दोष मुक्त केले होते. श्रीशांतने 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध नागपुरमधील वनडे सामन्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि 2006 मध्ये इंग्लंडविरुद्ध टेस्टमध्ये पदार्पण केले.

केरळच्या या वेगवान गोलंदाजाणे भारतासाठी 27 टेस्ट, 53 वनडे आणि 10 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहेत. आणि या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने एकूण 169 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 2011 मध्ये भारताकडून अखेरचा सामना खेळला होता.