NDA ही कोणा एकाच पक्षाची जहागिरी नाही, शिवसेनेचा भाजपवर वार
Sanjay Raut | (Archived and representative images)

राफेल प्रकरणाची चौकसी जेपीसीद्वारे (JPC) करा. ही चौकशी करुन विरोधकांचे तोंड गप्प करा. सरकार पारदर्शी आहे तर राफेल प्रकरणात घाबरण्याचे कारण काय? असा हल्लाबोल करतानाच एनडीए (NDA) ही कोणाक एकाच पक्षाची जहागिरी नाही, असा जोरदार वार शिवसेनेने भाजपवर केला आहे. शिवसेना (Shiv Sena) हा एनडीएचा घटक आणि सत्ताधारी भाजपचा मित्रपक्ष आहे. याच मित्राने भाजपवर गुरुवारी जोरदार वार केला. सरकारने केवळ राफेलच नव्हे तर ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणाचीही चौकशी जेपीसद्वारे करावी. इतकेच नव्हे तर, दोन्ही प्रकरणाची चौकशी एकाच जेपीसीद्वारे करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एका खासगी वृत्तवाहिणीला एक मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी राफेल, ऑगस्टा वेस्टलँड, राम मंदिर, शिवसेनेचा सरकारमध्ये सहभाग, आदी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. या वेळी बोलताना राऊत म्हणाले, 'सरकारससमोर प्रश्न उपस्थित करणे यात काहीच चुकीचे नाही. सरकारमध्ये आमचा एक मंत्री आहे. पण, या मंत्र्याचा सरकारमध्ये किती वाटा आहे हे अवघ्या देशाला माहिती आहे. राफेलचा मुद्दा हा देशाच्या सुरक्षिततेचा मुद्दा आहे. सरकारच्या मनात काही वाईट हेतू नाही. सरकारला वाटते त्यांनी जर का कोणते चुकीचे काम केले नाही तर ते जेपीसीद्वारे राफेल प्रकरणाची चौकशी करायला का घाबरत आहेत. सत्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही.' (हेही वाचा, 'पंतप्रधान मोदींची मुलाखत म्हणजे पेल्यातले वादळ; गाजली नाहीच, फक्त वाजली')

पुढे बोलताना राऊत म्हणाले, 'आम्ही केवळ राफेलबद्दल नाही बोलत. आम्ही ऑगस्टा वेस्टलँडबाबतही बोलतो आहोत. दोन्ही प्रकणांची जेपीसीद्वारे एकत्रच चौकशी करा. ऑगस्टा प्रकरणात विदेशातून पकडून आणलेला मिशेल कोणाची नावे घेत आहे. तर, राफेलमध्येही फ्रान्सचे माजी राष्ट्रपती अनेकांची नावे घेत आहेत. मिशेल ज्यांची नावे घेतोय त्यांना आरोपी समजले जात आहे. तर, फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ज्यांची नावे राफेल प्रकरणात घेत आहे त्यांना क्लिन चिट मिळत आहे. सरकारला वाटते की राफेलमध्ये कोणता घोटाळा नाही. तर, मग आरोपांची जेपीसीद्वारे चौकशी करा.'

शिवसेना जागावाटपासाठी भाजपवर दबावाचे राजकारण करते आहे काय? या प्रश्नाचे उत्तर देताना राऊत म्हणाले, शिवसेना कधीच दबावाचे राजकारण करत नाही. 2014 मध्ये भाजपसोबतची युती तुटली. त्यानंतर आम्ही स्वबळावर लढलो. आम्ही सरकारमध्ये जरुर आहोत. पण, आमची युती नाही. आमचा कोणताच नेता युतीबाबत भाष्य करत नाही. शिवसेनेला कधीही 'प्रेशर पॉलिटिक्स'ची गरज पडली नाही. पडणार नाही. आम्ही एनडीएमध्येही आहोत. पण, एनडीए ही कोणत्याही एका पक्षाची मालकी नाही. जेव्हा एनडीए स्थापन झाली तेव्हा आज एनडीएमध्ये जे लोक आहे ते नव्हते. जेव्हा एनडीएची निर्मिती झाली तेव्हा, शिवेसना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेई, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन आदी नेते होते. या नेत्यांनी एकत्र येत एनडीए बनवली. काँग्रेसला विरोध करण्यासाठी एनडीएची स्थापना झाली. आज एनडीए कोणाही एका पक्षाची जहागिरी नाही, असे संजय राऊत म्हणाले.