Nawab Malik On Delhi Violence: दिल्ली हिंसाचारामागे भाजपचा हात; राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांचे गंभीर आरोप
Nawab Malik | ( Photo Credits: ANI))

देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना मंगळवारी (26 जानेवारी) राजधानी दिल्लीत (Delhi) शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चा (Tractor Rally) दरम्यान उफाळलेला हिंसाचार धक्कादायक होता. या हिसांचारानंतर देशाच्या राजकारणात थिणगी पडल्याचे दिसत आहे. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यातच राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. तसेच दिल्ली हिंसाचारामागे भाजपचाच हात असल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे.

दिल्ली हिंसाचारानंतर नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान ते म्हणाले की, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लाल किल्ल्याच्या दिशेने ट्रॅक्टर रॅली गेली होती. पोलिसांनीच त्यांना लाल किल्ल्याचा मार्ग दाखवला होता. त्यावेळी भाजपशी संबंधित दीप सिद्धूने तिथे ध्वज फडकवण्याचे काम केले होते. याच दिपू सिद्धूने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यामुळे त्याचा कालच्या घटनेत महत्वाचा रोल आहे का? याचा खुलासा भाजप का करत नाही, असा सवाल मलिक यांनी उपस्थितीत केला आहे. एवढेच नव्हेतर, दिल्ली हिंसाचारामागे भाजपचाच हात आहे, असा आरोप सुद्धा मलिक यांनी केला आहे.

याशिवाय, दिल्लीती घटना घडल्यानंतर शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप नेते आशिष शेलार यांनाही त्यांनी उत्तर दिले आहे. शरद पवारांवर टीका करणाऱ्या आशिष शेलार यांना डोके आहे का? असा सवाल उपस्थित करत मलिक यांनी जोरदार टोला लगावला आहे. हे देखील वाचा- Maharashtra-Karnataka Border Dispute: कर्नाटक व्याप्त भाग मराठी भाषिकांचा भाग केंद्रशासित घोषित करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दिल्लीत घडलेल्या हिंसाचारात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय 300 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारीदेखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. या हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत अनेक गुन्हे नोंदवण्यात आले असून, या हिंसाचारास कारणीभूत असलेल्या लोकांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.