Summer Temperature | (Photo credit: archived, edited, representative image)

भारतात सध्या उन्हाळा वाढत आहे. विदर्भामध्ये सूर्यनारायण सध्या अधिकच तीव्र झाला आहे. देशातील सर्वात उष्ण शहर नागपूर आहे. 19 एप्रिल दिवशी नागपूर (Nagpur) मधील तापमान 44.7 अंशांपर्यंत पोहचले होते. आयएमडी च्या माहितीनुसार, नागपूरसाठी हा यंदाच्या हंगामातील सर्वात उष्ण दिवसच नव्हता तर भारतातील सर्वाधिक तापमान देखील नोंदवले गेले आहे. नागपूरात तापमान सामान्य हंगामी सरासरीपेक्षा 4.1 अंश सेल्सिअस जास्त आहे.

आयएमडीने नागपूरमध्ये उष्णतेची लाट जाहीर केली नसली तरी, तीव्र उष्णतेमुळे दैनंदिन जीवनावर लक्षणीय परिणाम झाला आहे. नागपूरकरांना घरातच राहावे लागत आहे आणि दुपारच्या वेळी प्रवास करणे टाळावे लागत आहे. शहरात कोरडे आणि कडक हवामान होते. पाणी आणि थंड उपकरणांची मागणी सध्या वाढली आहे. नक्की वाचा: Maharashtra Weather Forecast: कोकण कोरडा, विदर्भात वादळी वारे आणि वीजा; काही जिल्ह्यांत हलका पाऊस; जाणून घ्या हवामान अंदाज. 

नागपूरसह, उत्तर महाराष्ट्रातील भुसावळमध्येही तीव्र उष्णता नोंदवली गेली आहे. 44.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उष्ण शहर बनले आहे. भुसावळने यापूर्वी 10 एप्रिल रोजी 44.4 अंश सेल्सिअस तापमान गाठले होते परंतु अलिकडच्या वाढीपूर्वी काही प्रमाणात आराम मिळाला होता.

पुढील काही दिवस नागपूरसह राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भातील काही भागात तीव्र उष्णता कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नागरिकांना पाणी पित राहण्याचा, हलके फुलके कपडे घालण्याचा आणि थेट सूर्यप्रकाश टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषतः दुपारी 12-4 या वेळेत घराबाहेर पडणं टाळण्यातच हित आहे. तज्ज्ञांच्या मते सध्याचा कल मध्य भारतात उन्हाळ्याचा पीक सीझन सुरू होण्याचे संकेत देतो, येत्या आठवड्यात तापमान वाढीचा अंदाज आहे.