मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 3 जण गंभीर जखमी
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Goa National Highway) भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. पेणजवळ उड्डाणपूलाजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर पुलावरुन कार खाली कोसळल्याने तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मध्यरात्री 1.30 वाजताच्या सुमारास घडली असून कार भरधाव वेगाने जात असताना ती पुलावरुन खाली कोसळल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तीन जणांपैकी 2 जणांची प्रकृती अधिक गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर एम.जी.एम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कल्याण येथून श्रीवर्धन येथे जाण्यासाठी निघालेल्या कारला हॉटेल झी गार्डनसमोर कारचा अपघात झाला. कारचा वेग अधिक असल्याने ती पुलावरुन थेट 15 किमी खाली कोसळली गेली. दुर्घटना घडताच स्थानिकांनी जखमींना तातडीने गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच पोलिसांना सुद्धा याबाबत माहिती देण्यात आली. सध्या जखमींना पनवेलमधील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणाची पोलिसांनी अधिक चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.(बेळगाव: ट्रॅक्टर नाल्यात उलटून 8 ऊसतोड कामगारांचा मृत्यू; 30 जण जखमी)

 दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नाशिक (Nashik) शहरामध्ये कळवण मालेगाव रस्त्यावर येथे एक विचित्र रोड अपघात घडला होता. यातही 26 जणांचा मृत्यू झाला होता तर 32 जण जखमी झाले होते. या घटनेत सुद्धा बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्याची धडक रिक्षाला बसली. आणि तेव्हाच ही दोन्ही वाहने नजिकच्या विहिरीमध्ये कोसळली होती.