OBC राजकीय आरक्षणासाठी भाजप आक्रमक; मुंबईत मंत्रालयावर धडक मोर्चा
BJP | Twitter/ANI

ओबीसी राजकीय आरक्षण (Political Reservation of OBCs) रद्द झाल्यानंतर महाराष्ट्रात अनेक घडामोडींना वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर आता मध्य प्रदेशने ते पुन्हा मिळवण्यात यश प्राप्त केल्यानंतर महाराष्ट्रातही आशा पल्लवित झाल्या आहे. आज याच प्रश्नावरून भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपा मुंबई कार्यालय (BJP Mumbai Office) ते मंत्रालय (Mantralay) असा धडक मोर्चा काढून त्यांनी ओबीसी राजकीय आरक्षणाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.

मुंबई मध्ये आयोजित आजच्या भाजपाच्या मोर्च्याचं नेतृत्त्व योगेश टिळेकर करत आहे. या मोर्च्यामध्ये भाजपा नेत्यांनीही सहभाग घेत राज्य सरकार वर तोफ डागली आहे. मध्य प्रदेशात पुन्हा ओबीसींना राजकीय आरक्षण मिळू शकतं मग महाराष्ट्राला का नाही? महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेश सरकारची मदत घेऊन ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा असं म्हटलं आहे.

दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश आहेत आणि जर राज्य सरकार वेळेत ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा मिळवू शकले नाही तर या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवायच घेण्याची वेळ येणार आहे. परंतू राज्यात निवडणूक प्रक्रिया सुरु होण्यापुर्वी OBC आरक्षण लागू झालेलं असेल असा विश्वास कालच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे.