Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्राची चिंता वाढली! राज्यात आज तब्बल 57 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, 222 मृत्यू
Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. राज्यात आज आणखी 57 हजार 74 कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 222 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 30 लाख 10 हजार 597 वर गेली आहे. यापैंकी 55 हजार 878 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 25 लाख 22 हजार 823 जणांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम पुन्हा एकदा युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. हे देखील वाचा- महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांबाबत राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती; राज्यात काय बंद आणि काय राहणार सुरु? घ्या जाणून

एएनआयचे ट्वीट-

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लादले जाणार असून त्याबाबतच्या गाइडलाइन्स जारी केल्या जाणार आहेत. राज्यात उद्यापासून केवळ अत्यावश्यक सेवांसोबत लोकल ट्रेन, बस, टॅक्सी, रिक्षा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, मॉल, दुकाने, सिनेमागृह, नाट्यगृह, ब्युटी पार्लर, केशकर्तनालये, धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात येणार आहेत. याचबरोबर शासकीय कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. खासगी कार्यालयांसाठी वर्क फ्रॉम होम बंधनकारक आहे.