ठाणेः घोडबंदर रोडवरील वसंत लीला संकुलातील संरक्षक भिंत कोसळली, कारचे मोठे नुकसान
Wall Collapsed | (Photo Credits: ANI)

Maharashtra Monsoon 2019: हवामान विभागाने वर्तवलेली मुसळधार पावसाची शक्यता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. गेल्या काही तासांपासून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे शहरातील सकल भागात पाणी साचले तर, काही ठिकाणी भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. ठाणे (Thane) शहरातील घोडबंदर रोड (Ghodbunder Road) परिसरात असलेल्या वसंत लीला (Vasant Leela Socity) संकुलातही संरक्षण भिंत कोसळली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (CCTV Footage) झाली आहे. दरम्यान, या घटनेत नेमके किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही.

आज (शनिवार, 3 ऑगस्ट 2019) मध्यरात्रीपासूनच शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची मोठी अडचण झाली. शहराची नस म्हणून ओळखली जाणारी रेल्वेही काही ठिकाणी ठप्प नेहमीच्या वेळेपेक्षा काही मिनिटे उशीरा धावत होती. त्यामुळे काही लोक मोठ्या निश्यचाने घराबाहेर पडले. मात्र, त्यांना रेल्वे स्थानकावरुन परत घरी यावे लागले.

मध्य रेल्वेवरील कल्यान दिशेने जाणारी जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. तर, हार्बर रेल्वे लाईन ठप्प झाली आहे. दुपारनंतर काही भागात पावसाचा जोर ओसलला आहे. मात्र, विस्कळीत झालेली वाहतूक अद्यापही कायम आहे.

आयएनएस ट्विट (व्हिडिओ)

प्राप्त माहितीनुसार, अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. दादर, माटुंगा, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, अंधेरी, विक्रोळी, घाटकोपर, कांजूरमार्ग परिसराने पावसाने अधिक जोर पकडला आहे. तर, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली, ठाणे परिसरात रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी मोठ्या प्रमाणावर कोसळत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश स्थिती आहे. तर, पुणे, पिंपरी आणि नाशिकमध्येही दमदार पावसाने हजेरी लावली आहे.

हवामान खात्याने येत्या काही तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर, किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याचे अवाहन केले आहे. दरम्यान, राज्यभरातील अनेक ठिकाणी समाधानकारक म्हणावा असा पाऊस पडत असला तरी, राज्यातील काही भाग मात्र अद्यापही कोरडाठाक आहे. त्यामुळे एका बाजूला मुसळधार पाऊस तर दुसऱ्या बाजूला दुष्काळसदृश्य स्थिती असे चित्र आहे.