विधान परिषद निवडणूक 2020: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 13 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननीत वैध; अपक्ष उमेदवार राठोड शेहबाज अलाउद्दीन यांचे नामनिर्देशनपत्र अवैध
Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits- Facebook )

Maharashtra Legislative Council Election 2020: महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2020 साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यासह इतर 13 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननीत वैध ठरले आहेत. तर, अपक्ष उमेवदवार राठोड शेहबाज अलाउद्दीन यांचा निवडणूक अर्ज अवैध ठरला आहे. दाखल केलेला निवडणूक अर्ज मागे घेण्याची अंतिम तारखी 14 मे 2020 आहे. 14 मे पर्यंत 13 पैकी 4 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध पार पडणार आहे.

छाननीत अर्ज वैध झालेल्या उमेदवारांची नावे आणि पक्ष खालीलप्रमाणे-

  • गोपीचंद कुंडलिक पडळकर- भाजपा
  • प्रवीण प्रभाकरराव दटके- भाजपा
  • रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील- भाजपा
  • डॉ. अजित माधवराव गोपचडे - भाजपा
  • संदीप सुरेश लले- भाजपा
  • रमेश काशिराम कराड- भाजपा
  • उद्धव बाळासाहेब ठाकरे- शिवसेना
  • नीलम दिवाकरराव गोऱ्हे- शिवसेना
  • शशिकांत जयवंतराव शिंदे- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
  • अमोल रामकृष्ण मिटकरी- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
  • किरण जगन्नाथ पावसकर- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
  • शिवाजीराव यशवंत गर्जे- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
  • राजेश धोंडीराम राठोड- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

(हेही वाचा, विधान परिषद निवडणूक 2020: कोण आहेत रमेश कराड? भाजपने अखेरच्या क्षणी त्यांना उमेदवारी का दिली?)

दरम्यान, विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी 4 मे पासून नामांकन प्रक्रिया सुरु झाली. 11 मे ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख होती. 12 मे रोजी म्हणजेच आज या अर्जांची छाननी झाली. छाननीत अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांना 14 मे पर्यंत आपले निवडणूक अर्ज मागे घेता येणार आहेत. कोणत्याही चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध पार पडेल. अन्यथा 21 मे या दिवशी सकाळी 9 वाजलेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. तसेच, त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.