राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा
Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits- Facebook )

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनचे आदेश राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला. परंतु लॉकडाऊनमुळे शैक्षणिक वर्षासह बोर्ड परिक्षांचे वेळापत्रक बिघडले आहे. तसेच राज्यातील विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन (Final Year Exam) राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यामध्ये काही मतभेद सुद्धा झाले आहेत. याच पार्श्वभुमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आता उद्या (30 मे) राज्यातील विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे उद्या राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेतला जाईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आणि तंत्रमंत्री उदय सामंत यांनी असे म्हटले आहे की, उद्या दुपारी 12.30 वाजता उद्धव ठाकरे विद्यापीठातील सर्व कुलगुरुंशी व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. तसेच पुढे बोलताना सामंत यांनी असे म्हटले की, अंतिम वर्षाच्या परीक्षाबाबत सर्वांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे जाणवत आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी बाबत उद्धव ठाकरे यांच्याकडून सद्धा विचार केला जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे विद्यार्थ्यांच्या हितासाठीच कुलगुरुंशी संवाद साधून योग्य तो निर्णय घेतील असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.(10th and 12th Board Exam Results 2020 Dates: 10 वी, 12 वी बोर्ड परिक्षेचा रिझल्ट विद्यार्थ्यांना mahresult.nic.in वर पाहता येणार, जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता)

यापूर्वी कोरोना व्हायरसमुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नयेत आणि विद्यार्थ्यांना श्रेणी देऊन पदवी प्रदान करावी अशी विनंती राज्य सरकारकडून विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केली होती. त्यानंतर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी त्याची दखल घेत शिक्षणमंत्र्यांनी याबाबत ढवळाढवळ करु नये असे म्हटले होते. उलट अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात असे मुख्यमंत्र्यांना सांगितले होते.