Gram Panchayat Election Results 2022: ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकासआघाडीची आगेकूच, भाजपही तोडीस तोड, शिंदे गटाबाबत उत्सुकता
Election Results | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यातील तब्बल 1165 ग्रामपंचायतींसाठी सुरु असलेल्या निवडणुकांसाठी (Gram Panchayat Election 2022) पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी आज (17 ऑक्टोबर) पार पडत आहे. मतमोजणी सुरु झाली असून, हळूहळू निकालही हाती येऊ लागले आहेत. आतापर्यंत 100 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी 23 ठिकाणी भाजप, 15 ठिकाणी ठाकरे गट तर 14 ठिकाणी शिंदे गटाने विजय मिळवला आहे. काँग्रेस 17 तर काँग्रेसने 9 ठिकाणी विजय मिळवला आहे. तर उर्वरीत 22 ठिकाणी इतरांनी बाजी मारली आहे. भिवंडीमध्ये मनसेला काहीसा आधार प्राप्त झाला असून, खाते खोलण्यात यश आले आहे.

आघाडीची बाजी, युतीची कसरत

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार ग्रामीण भागात महाविकासआघाडी बऱ्यापैकी बाजी मारताना दिसत आहे. महाविकासआघाडीने आतापर्यंत 41 जागांवर बाजी मारली आहे. तर युती 37 जागा मिळवल्या आहेत. अद्यापही निकाल हाती येणे सुरु आहे. त्यामुळे हे आकडते सातत्याने बदलत राहणार आहेत. त्यामुळे अंतिम चित्र जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा आकडेवारी आणखी बदललेली दिसणार आहेत. (हेही वाचा, Gram Panchayat Election 2022: 1165 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, जनतेतून थेट सरपंच निवड, 17 ऑक्टोबरला मतमोजणी)

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकांसोबतच सरपंच पदासाठीही जनतेतून थेट निवडणूक लढवली जात आहे. त्यामुळे सरपंच पदासाठी गावकरी कोणाला अधिक संधी देतात याबाबतही उत्सुकता आहे. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर बदललेल्या राजकारणाबाबतही नागरिकांना उत्सुकता आहे. प्रामुख्याने राज्यातील ग्रामीण जनता राजकीय विचार कसा करते आहे हेदेखील या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुले या वेळच्या ग्रामपंचायत निवडणूक अधिक महत्त्वाच्या ठरणार आहेत.

ग्रामपंचायतींमध्ये थेट जनतेतून सरपंच निवडले जात असल्यामुळे जनतेच्या मनातला फैसला काय आहे याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, इतर सर्व ठिकाणी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजता मतदान पार पडले. अपवाद फक्त गडचिरोली जिल्ह्याचा. गडचिरोलीत नक्षलग्रस्त भागात मतदान असल्याने सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत तिथे मतदान पार पडणारा आहे.