Janata Curfew in Kolhapur: कोल्हापूर शहरात 11 ते 21 सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू, खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा विरोध
Janata Curfew | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

कोरोना व्हायरस संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोल्हापूर शहरात 11 ते 21 सप्टेंबर असा एकूण 10 दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. जनता कर्फ्यू दरम्यान नागरिकांवर कोणत्याही प्रकारचे बंधण असणार नाही. कोणावरही सक्ती केली जाणार नाही. परंतू, नागरिकांनी स्वत:हूनच निर्बंध पाळावे आणि जनता कर्फ्यूला सहकार्य करावे असे अवाहन करण्यात आले आहे. कोल्हापूरातील चार तालुक्यात जनता कर्फ्यू या आधीच लागू करण्यात आला आहे. त्यानंतर आता शहरातही हा कर्फ्यू लागू करण्यात येत आहे. दरम्यान, भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले यांनी या कर्फ्यूला कडाडून विरोध केला आहे. सुसज्ज यंत्रणा असताना जनता कर्फ्यू लाऊन सर्वसामान्य जनतेच्या पोटाला का मारता असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

जिल्ह्यात जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत एक संयुक्त बैठक घेण्यात आली. वास्तविक जनता कर्फ्यूबाबत आज दोन बैठका पार पडल्या. एक बैठक कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सची बैठक झाली. दुसरी बैठक महापौर निलोफर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत सायंकाळी पार पडली.

एका बाजूला जिल्ह्यात कोरोना व्हायरस संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दुसऱ्या बाजूला लोकॉऊन आणि कर्फ्यू आदी कारणांमुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था विचित्र कात्रित सापडली आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्याबाबत वेगवेगळी मतमतांतरं आहेत. अशा स्थितीत काहींच्या मते जनता कर्फ्यू 7 दिवसांचा असावा काहींच्या मते 10 दिवसांचा. (हेही वाचा, Coronavirus Cases In Maharashtra: राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या आजही 20 हजारांच्या पार; 13,234 जणांना डिस्चार्ज)

दरम्यान, महापालिका प्रशासन अथवा पोलीस, नागरिकांवर कोणत्याही प्रकारची बंधणे आणणार नाहीत हे स्पष्ट करण्यात आल्यावर 11 ते 21 सप्टेंबर असा दहा दिवसांचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.