Chhagan Bhujbal On Bhagat Singh Koshyari: राज्यपालांनी अर्णव गोस्वामी यांची चिंता करू नये, सरकार त्यांची नियमांनुसार काळजी घेत आहे - छगन भुजबळ
Chhagan Bhujbal, Bhagat Singh Koshyari (PC- PTI)

Chhagan Bhujbal On Bhagat Singh Koshyari: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswai) यांच्या अटक प्रकरणात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनीदेखील उडी घेतली आहे. राज्यपालांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना फोन करुन अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा आणि आरोग्यबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्या, अशी सूचनादेखील गृहमंत्र्यांना दिली. यावरून आता राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपालांना खोचक टोला लगावला आहे. राज्यपालांनी अर्णव गोस्वामी यांची चिंता करू नये. सरकारी नियमांनुसार, त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ यांना नाशिक येथील पत्रकारपरिषदेत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना भुजबळ यांनी सांगितलं की, राज्यपालंनी अर्णव गोस्वामी यांची काळजी करण्याची गरज नाही. कारण नियमानुसार अर्णव गोस्वामी यांची सर्व काळजी घेतली जात आहे. राज्यपाल अदी छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये लक्ष घालत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, असं खोचक वक्तव्यदेखील यावेळी भुजबळ यांनी केलं. (हेही वाचा - Maharashtra Legislative Council Elections: नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या सह विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंंघाच्या निवडणूकीसाठी 4 भाजपा उमेदवारांची यादी जाहीर)

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. आज राज्यपालांनी थेट गृहमंत्र्यांना फोन करून अर्णब गोस्वामी यांची सुरक्षा तसेच आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली. याशिवाय अर्णब यांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलू द्यावं, भेटू द्यावं अशी सूचनादेखील राज्यपालांनी केली.

दरम्यान, मी अर्णव गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणार असून हिंमत असेल तर अडवून दाखवा, असं आवाहन भाजप नेते राम कदम यांनी मुंबई पोलिसांना दिलं आहे. राम कदम आज अर्णव गोस्वामी यांना भेटण्यासाठी नवी मुंबईच्या तळोजा येथील कारागृहात जाणार आहेत. यासंदर्भात राम कदम यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे.