मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मंत्रिमंडळाशी चांगला समन्वय, ते सर्वांची भावना समजून घेतील; काँग्रेसच्या नाराजीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया
Sanjay Raut, Shiv Sena | (Photo Credits-ANI)

काँग्रेस पक्षातील काही नेत्यांची मुलाखत प्रसारमाध्यमांतून वाचली. प्रामुख्याने अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची. जर त्यांचे काही म्हणने असेल तर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा करावी. हा सरकार आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष नाही. महाराष्ट्रावर आलेले कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि निसर्ग चक्रीवादळ हे मोठे संकट आहे. त्यामुळे या संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री सर्वांच्या भावना समजून घेतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय (Sanjay Raut) राऊत यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचीश समन्वय चांगला आहे. कोणीही अस्वस्थ नाही. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झालेली आहे. संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी प्रत्येकाचे मत मुख्यमंत्री आजमावतील. ते सर्वांचे म्हणूने ऐकून घेतात, असेही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. दै. सामनातील अग्रलेखाबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले सामनाच्या लिखाणाची एक खास अशी स्टाईल आहे. त्यामुळे त्यानुसारच त्यातील लिखाण असते.

दरम्यान, दै. सामना संपादकीयामळे राज्यातील राजकीय वर्तुळाला चर्चेला नवा विषय मिळाला आहे. काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरुन शिवसेनेने दै. सामनातून टोलेबाजी केली आहे. ही टोलेबाजी करत असताना काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शाहण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुररकुरायचे, कधी कुस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. परंतू, सत्तेचा अमाप लोभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही., खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये, असा टोला सामना संपादकीयातून लगावण्यात आला होता. (हेही वाचा, काँग्रेसची जुनी 'खाट का कुरकुरतेय?', शिवसेना मुखपत्र सामना संपादकियातून टोलेबाजी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला)

दरम्यान, सामनातील अग्रलेखाबाबत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी टीप्पणी केली आहे. दै. समाना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे. त्यातील आज लिहिलेला अग्रलेख संपूर्ण माहिती घेऊन लिहायला हवा होता. आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्यांपुढे मांडू. संपूर्ण माहिती घेतल्यावर आणखी एक चांगला अग्रलेख दै. सामनातून येईल, अशी टीप्पणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. काँग्रेसच्या भूमिकेवर सामना संपादकीयातून आज टोलेबाजी करण्यात आली होती. त्यावर पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसने आपली भूमिका मांडली आहे.