Ashadi Wari 2021: संत तुकाराम महाराज, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळाच्या पार्श्वभूमीवर देहू, आळंदी मध्ये 28 जून ते 4 जुलै दरम्यान संचारबंदी
File Photo Of Sant Dyaneshwar Palkhi (Photo Credits: Wiki Commons)

जून माहिना उजाडला की वारकर्‍यांमध्ये, विठू माऊलीच्या भक्तांमध्ये वारीचे वेध सुरू होतात. पण यंदा देखील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीच्या (Ashadi Wari) पायी दिंडी आणि वारीला सरकारने परवानगी नाकारली आहे. वाढता कोरोना धोका पाहता आता पालख्यांचे प्रस्थान बस द्वारा केले जाईल तर येत्या काही दिवसांत संत तुकाराम महाराज (Sant Tukaram) व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर (Sant Dyaneshwar) महाराज पालखी प्रस्थान सोहळा पाहता आता देहूगाव (Dehu) व आळंदी शहर (Aalandi) आणि आसपासच्या परिसरात 28 जून ते 04 जुलै पर्यंत संचारबंदी (Curfew)  जाहीर करण्यात आली आहे. Ashadhi Ekadashi 2021: आषाढी एकादशीनिमित्त यंदाही राज्यातील 10 मानाच्या पालख्यांचा होणार एसटी बसमधून प्रवास, 19 जुलैला प्रस्थान- मंत्री अनिल परब.

दरम्यान देहू मधून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान 1 जुलै दिवशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान आळंदी मधून 2 जुलै ला होणार आहे. या सोहळ्यात मोजक्याच वारकर्‍यांना परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे सामान्य भाविकांची गर्दी रोखण्यासाठी आणि त्यामधून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आता प्रशासनाकडून संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. Curfew In Pandharpur: आषाढी वारी दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मध्ये 17-25 जुलै दरम्यान संचारबंदी; सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी.

यंदा 20 जुलै दिवशी देवशयनी आषाढी एकादशी आहे. यानिमित्ताने पालखीच्या 5 मानकर्‍यांना पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिरामध्ये प्रवेश दिला जाईल तर मुख्यमंत्र्यांसह काही मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे. या काळात सामान्य भाविकांसाठी पंढरपूरचं विठ्ठल- रूक्मिणी मंदिर बंद राहणार आहे. पण ऑनलाईन दर्शन 24 तास खुले ठेवले जाणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारी, गोल रिंगण, उभे रिंगण यांच्या माध्यमातून मजल- दरमजल करत वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालत जातात मात्र यंदा सलग दुसर्‍या वर्षी त्या परंपरेमध्ये खंड पडणार आहे.