Sharad Pawar On ED, CBI: नव्या राज्यकर्त्यांकडून सीबीआय, ईडी द्वारे सूड उगवण्याचा देशात नवा पॅटर्न- शरद पवार
Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सीबीआय (CBI), ईडी (ED) यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचे छापे, कारवाई आम्हाला नवी नाही. अलिकडे नव्या राज्यकर्त्यांकडून नव्या राज्यकर्त्यांकडून सीबीआय, ईडी द्वारे सूड उगवण्याचा देशात नवा पॅटर्न (New Pattern of Revenge) सुरु झाला आहे. त्यामुळे आम्हाला अनिल देशमुख यांच्यांवरील छाप्यांची चिंता वाटत नाही, अशी बिनधास्त प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र सरकारवर टोलेबाजी केली. रामटेक येथील माजी खासदार सुबोध मोहिते (Subodh Mohite) यांनी शरद पवार आणि अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश (Subodh Mohite Joine NCP) केला. या वेळी शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

शरद पवार यांना प्रसारमाध्यमांनी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडी, सीबीआय द्वारे होत असलेली छापेमारी. तसेच, केंद्रीय यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या चौकशांबाबत विचारले असता पवार म्हणाले, अशा प्रकारच्या चौकशा आणि गोष्टी या आम्हाला नव्या नाहीत. त्यामुळे आम्हाला त्याची चिंता वाटत नाही. अनिल देशमुख हे अशा चौकशांना सामोरे जाणारे पहिलेच नाहीत. या आधीही अनेक लोकांना अशा चौकशांना सामोरे जावे लागले आहे. यापुढेही जावे लागेल. आमचे सहकारीही या संस्थांचे स्वागत करतील, असा टोलाही शरद पवार यांनी या वेळी लगावला. माझ्याकडील प्राप्त माहितीनुसार, ईडीला अनिल देशमुख यांच्यावर टाकलेल्या छाप्यात काहीही मिळालं नाही. त्यामुळे अत्यंत नैराश्येपोटी आणखी काही मिळते आहे का याचा शोध घेतला जात आहे, असेही पवार या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Anil Deshmukh: अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजिव पालांडे ED च्या ताब्यात)

अलिकडील काही काळात असे लक्षात येत आहे की, जो राजकीय विचार आपल्याला आवडत नाही त्यासाठी यंत्रणेचा वापर करुन तो दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्राने अशा प्रकारचे राजकारण या आधी कधी पाहिले नव्हते. केंद्रात सत्ता बदल झाल्यापासून मात्र हे पाहायला मिळत आहे, असा आरोपही पवार यांनी या वेळी केला.

एएनआय ट्विट

राष्ट्रीय मुद्द्यांवर बोलताना पवार म्हणाले, पंतप्रधानांची कश्मीरी नेत्यांसोबत चर्चा झाली हे चांगले झाले. या आधी अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. परंतू, पुढे काहीच झालं नाही. या पुढे असं होऊ नये इतकीच अपेक्षा असेही पवार म्हणाले. दरम्यान, शरद पवार यांच्या निवासस्थानी दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीबाबत विचारले असता पवार म्हणाले, या बैठकीविषयी प्रसारमाध्यमांंमुळे लोकांच्यात गैरसमज पसरला. ही बैठक राष्ट्रमंचाने आयोजित केली होती. ही कोणत्याही प्रकारची राजकीय बैठक नव्हती. या बैठकीत आघाडीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. पण पर्यायी शक्ती उभा करायची असेल तर ती काँग्रेसला सोबत घेऊनच करावी लागेल, असे मत मी त्या बैठकीत मांडल्याचे पवार यांनी सांगितले.