फळे आणि भाज्यांवरील कीटकनाशके स्वच्छ करण्यासाठी काही उपाय; दूर होतील आरोग्याच्या अनेक समस्या
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, कडक ऊन त्यात प्रदूषण. अशावेळी फळे-भाज्या ताजेतवाने ठेवणे हे फार अवघड असते. मुंबई-पुण्यासारख्या शहरात तर भाजीपाला अथवा फळे बाहेरून येत असतात, त्यामुळे ती ग्राहकांना विकली जाण्यापर्यंत त्यांच्यावर अनेक रासायनिक गोष्टींचा फवारा मारला जातो. बरेचवेळा फक्त पाणी मारून अशा गोष्टी ताजी ठेवली जातात. त्यावर धूळ अथवा हवेतील अनेक घटक तसेच राहून जाण्याची शक्यता असते. कधी सफरचंदासारख्या फळांवर मेण लावून त्यांची चमक टिकवून ठेवली जाते. बाजारातून आणलेली फळे अथवा भाज्या साध्या पाण्यात धुतल्याने त्यातील फक्त 20 टक्के कीटकनाशके नष्ट होतात. ती व्यवस्थित स्वच्छ न झाल्याने अनेक आरोग्याचा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे फळे आणि भाज्या व्यवस्थित स्वच्छ करणे गरजेचे आहे, त्यासाठी या काही टिप्सचा वापर करू शकता.

> बाजारातून फळे-भाज्या घेऊन आल्यावर व्हिनेगरच्या पाण्यात ती 15 मिनिटे ठेवा. त्यानंतर चांगल्या पाण्याने ती स्वच्छ धुवून घ्या. व्हिनेगर 98 टक्के किटकनाशक घालवण्यास मदत करते.

> फळे आणि भाज्या स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा अतिशय फायदेशीर ठरतो. बेकिंग सोड्यामुळे 100 टक्के किटकनाशक साफ होतात. पाण्यात बेकिंग सोडा घालून त्यात फळे 15 मिनिटे ठेवा, त्यानंतर ती व्यवस्थित धुवून घ्या. (हेही वाचा: नेहमी बाहेरचे खाणे? फूड पॉयझनिंग झाल्यास हे करा उपाय व अशी घ्या काळजी)

> वाहत्या पाण्याखाली फळे किंवा भाज्या हाताने, किंवा एखाद्या नरम ब्रशने चोळून धुवा.

> मीठ आणि पाण्याच्या मिश्रणाने भाज्यांवरील क्लोरोपायरीफॉस, डीडीटी, सायपरमेथ्रीन, आणि क्लोरोथॅलोनिल हे कीटकनाशके प्रभावीपणे हटविली जाऊ शकतात.

> फळांवरील किंवा भाज्यांवरील कीटकनाशके हटविण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे फळे किंवा भाज्या स्वछ धुवून, साले काढून मगच खावीत.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)