Rahul Gandhi on Modi Government: मोदी सरकारने काय वाढवलं? बेरोजगारी, महागाई आणि मित्रांची कमाई; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
Rahul Gandhi | (Photo Credits: ANI)

Rahul Gandhi on Modi Government: महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार निशाणा साधला आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात महागाई आणि बेरोजगारी वाढली असल्याचं सांगत राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विट हँडलवरून मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'मोदी सरकारने काय वाढवलं? बेरोजगारी, महागाई, गरीबी आणि मित्रांची कमाई.'

राहुल गांधी यांनी या ट्वीटद्वारे एका वृत्तपत्रातील आकडेदेखील शेअर केली आहे. ज्यात असं म्हटलं आहे की, कोविड साथीच्या अगोदर 9.9 कोटी लोक मध्यम उत्पन्न गटात होते. जी संख्या आता 6.6 कोटींवर आली आहे. तसेच 2011 ते 2019 या कालावधीत 5.7 कोटी लोक कमी उत्पन्न गटातून बाहेर पडून मध्यम उत्पन्न गटाचा भाग बनले होते. दररोज दीडशे रुपये किंवा त्यापेक्षा कमी पैसे कमविणार्‍या लोकांची संख्या आता 7.5 कोटींवर पोहोचली आहे. (वाचा - Poverty In India: कोरोना विषाणू महामारीने 7.5 कोटी भारतीयांना गरिबीमध्ये ढकलले; Pew Research Center च्या अहवालातून खुलासा)

राहुल गांधी अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधत असतात. यापूर्वीही राहुल गांधी यांनी कृषी कायदा आणि इतर अनेक मुद्द्यांवर मोदी सरकारवर निशाणा साधत ट्विट केले आहे. राहुल गांधी यांनी आसाम दौर्‍यापूर्वी मोदी सरकारवर निशाणा साधून हे ट्विट केले आहे.

दरम्यान, आसाममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आज आसामच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्याचबरोबर आज पंतप्रधान मोदी यांची आसाममध्ये जाहीर सभा असणार आहे. राहुल गांधी आज तिनसुकियात आयओसी रिफायनरी कर्मचार्‍यांशी चर्चा करणार आहेत. यासह राहुल गांधी यांच्या दोन जाहीर सभा जोरहाट आणि विश्वनाथ येथे होणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी छाबुआमध्ये निवडणूक सभांना संबोधित करणार आहेत.