Bihar Politics: नितीश कुमारांनी बोलवली महत्वाची बैठक, महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप होणार?
Nitish Kumar | (Photo Credits: Facebook)

आजची सकाळ महाराष्ट्र (Maharashtra) आणि बिहार (Bihar) या दोन्ही राज्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. कारण अखेर महिन्याच्या प्रतिक्षेनंतर आज सकाळी मंत्रीमंडळ विस्तार (Cabinet Expansion) पार पडणार आहे तर बिहारमध्ये देखील मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी पक्षातील महत्वांच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे. तरी या बैठकीत नितीश कुमार काही महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. जेडीयूचे (JDU) माजी अध्यक्ष आरसीपी सिंह (RCP Singh) यांनी शनिवारी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली. भाजप आणि जेडीयूच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक तु तु मै मै सुरु आहे. यामुळेच बिहारमध्ये भाजप (BJP) आणि जेडीयूची युती तुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या NITI आयोगाच्या बैठकीतही नितीश कुमार सहभागी झाले नव्हते. तसेच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ex President Ram Nath Kovind) यांच्या निरोप समारंभाला आणि नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या शपथविधी समारंभाला ते उपस्थित राहिले नव्हते. दरम्यान, जेडीयूने आपल्या कोणत्याही प्रतिनिधीला केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी पाठवणार नसल्याचे जाहीर केले. तरी भाजप (BJP) सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. भाजपकडून नितीश कुमार यांचा पक्ष फोडण्याचा किंवा सरकार पाडण्यासाठी कोणतेही प्रयत्न करणार नाही. (हे ही वाचा:- MNS On Sanjay Raut: संजय राऊत यांना जेल मधून लिखानाची परवानगी? सामनातील प्रकाशित झालेल्या रोखठोक सदरावरुन मनसेचा सवाल)

 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी रात्री काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशीही संपर्क साधला होता. त्यानंतर युती तुटण्याच्या चर्चांना जोर आला आहे. याच पार्श्वभुमिवर नितीश कुमारांनी पक्षातील महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.