विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा वीर चक्र पुरस्कारानं होणार सन्मान
File image of Wing Commander Abhinandan Varthaman | (Photo Credits: IANS)

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman) यांचा यंदा वीर चक्र (Vir Chakra) देऊन सन्मान करण्यात येईल, अशी माहिती सुरक्षा मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला चोख उत्तर दिले. मात्र या चकमकीत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले. पाकिस्तानच्या तावडीत सापडलेल्या अभिनंदन यांची तब्बल 60 तासांनंतर सुखरुप सुटका करण्यात आली.

अभिनंदन यांच्या सह पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रातांत जैश-ए-मोहम्मदची स्थळे उद्धवस्त करणाऱ्या मिराज-2000 युद्ध विमानांनी हल्ला करणाऱ्या 5 वैमानिकांचाही मेडल देऊन सन्मान करण्यात येईल. (भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सूरतगड येथील एअर फोर्स तळावर पोस्टिंग)

भारतीय वायुसेनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणाऱ्या पुरस्कर्त्यांच्या यादीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून 14 ऑगस्ट रोजी मंजूरी देण्यात येईल. वीर चक्र हा भारतीय युद्ध काळात दिला जाणारा तिसरा सर्वोच्च सन्मान आहे. (राजस्थान: आता शालेय विद्यार्थ्यांना मिळणार विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याचे धडे)

भारतीय वायूसेनेच्या एअर स्ट्राईकला उत्तर देताना पाकिस्तानने 27 फेब्रुवारी रोजी एफ 16 विमाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसवून हल्ला केला. तेव्हा पाकिस्तानच्या विमानांचा पाठलाग करताना मिग 21 हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत पडलं. त्यात असलेले पायलट अभिनंदन हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले. त्यावेळेस अभिनंदन यांनी दाखवलेल्या धैर्याला सलाम म्हणून त्यांना वीर चक्र देण्यात येईल.