West Bengal Politics: भाजप गोत्यात; पश्चिम बंगालमध्ये 74 पैकी 24 आमदारांची राज्यपालांसोबतच्या बैठकीस दांडी, शुभेंदु अधिकारी यांची गोची
West Bengal Politics | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पश्चिम बंगालमध्ये ((West Bengal) तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजप (BJP) यांच्यात सुरु असलेली राजकीय लढाई (West Bengal Politics ) अद्यापही थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. विधानसभा निवडणूक 2020 मध्ये भाजपच्या तिकीटावर लढलेले आणि निवडूण आलेले अनेक आमदार टीएमसी सोबत सलगी करताना दिसत आहेत. त्यातील काही घरवापसी करत पुन्हा टीएमसीमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा आहे. अर्थात भाजप या सर्व चर्चा फेटाळून लावत आहे. परंतू, भाजपच्या चर्चा फेटाळून लावण्याला धक्का तेव्हा बसला जेव्हा शुभेंदु अधिकारी (Suvendu Adhikari) यांची राज्यपालांसोबत भाजप आमदारांची बैठक होती. या बैठकीला भाजपच्या एकूण आमदारांपैकी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आमदार गैरहजर होते. विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांच्यासोबत भाजप आमदारांनी सोमवारी(14 जून) सायंकाळी राज्यपाल जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांची भेट घेतली.

बंगालमध्ये होत असलेल्या अनुचित घटनांबाब राज्यपालांना माहिती देणे आणि इतरही काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणे असा या बैठकीचा हेतू होता. परंतू, भाजपचे बरेच आमदार या बैठकीस गैरहजर राहिले. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे 74 आमदार निवडूण आले आहेत. त्यापैकी राज्यपालांसोबतच्या बैठकीत 24 आमदार गैरहजर होते. त्यामुंळे रिवर्स मायग्रेशन (तृणमूल काँग्रेस पक्षात घरवापसी) होण्याच्या चर्चांना अधिक बळकटी मिळू लागली आहे. अशीही चर्चा आहे की, भाजपचे नवनिर्वाचित आमदार हे शुभेदु अधिकारी यांचे नेतृत्व मान्य करायला तयार नाहीत. (हेही वाचा, Politics in Bihar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हनुमान एटका पडला; LJP अध्यक्ष चिराग पासवान यांच्याविरोधात पक्षात बंडाळी, 5 खासदारांचे लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र)

शुभेंदु अधिकारी हे पाठिमागील वर्षी म्हणजेच डिसेंबर 2020 मध्ये निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले होते. त्यानंतर तृणमूल काँग्रेसमधील अनेक लोक भाजपमध्ये आले. त्यामुळे भाजपमध्ये शुभेंदु अधिकारी यांची प्रतिमा उंचावली आहे. निवडणुकीनंतर शुभेंदु अधिकारी यांना विरोधी पक्षनेतने बनविण्यात आले आहे. गेल्या महिण्यात आलेल्या चक्रीवादळाबाबत आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतही त्यांना निमंत्रित करण्यात आले होते.

सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भाजपमधील काही आमदार नाराज आहेत. काही आमदार मुकुल रॉय यांच्याप्रमाणे पुन्हा तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची चिन्हे आहेत.