Akhilesh Yadav On Alliance: समाजवादी पार्टी कोणासोबत करणार आघाडी? अखिलेश यादव यांचे स्पष्ट संकेत
Akhilesh Yadav | (Photo Credits: Facebook)

उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh ) माजी मुख्यमंत्री आणि समाजावादी पार्टी (Samajwadi Party) प्रमुख अखिलेश यादव ( Akhilesh Yadav) यांनी काही नवे संकेत दिले आहेत. या संकेतांवरुन उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 (Uttar Pradesh Assembly Election 2022) मध्ये काही वेगळी समिकरणे दिसतील अशी चर्चा सुरु झाली आहे. अखिलेश यादव आयोजित पत्रकार परिषदेत शनिवारी (14 नोव्हेंबर, 2020) बोलत होते. या वेळ बोलताना अखिलेश यादव यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशमध्ये या वेळी समाजवादी पक्ष छोट्या प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करेन. मोठ्या आणि राष्ट्रीय पक्षांसोबत आघाडी करणार नाही.

अखिलेश यादव यांच्या वक्तव्याचा अर्थ स्पष्ट आहे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष प्रगतिशील समाजवादी पार्टी (PSP) सोबत आघाडी करेल. पीएसपी पार्टी ही मुलायमसिंह यादव यांचे छोटे बंधू आणि अखिलेश यादव यांच्या काकांची पार्टी आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत काका पुतणे निवडणुक लढवतील. त्या बदल्यात सत्ता आल्यानंतर अखिलेश यादव शिवपाल यादव यांना कॅबिनेटमध्ये जागा देतील. (हेही वाचा, Presidential Rule: उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा- अखिलेश यादव)

अखिलेश यादव यांना पत्रकार परिषदेत विचारले की, आपण आपल्या काकांच्या पक्षाशी आघाडी करु शकता का? यावर अखिलेश यादव यांनी म्हटले की, आम्ही त्यांच्याही पक्षाला सामावून घेऊ. जसवंतनगर ही त्यांची (शिवपाल यादव) यांची जागा (मतदारसंघ) आहे. समाजवादी पक्षाने तो त्यांना सोडला आहे. सपा या ठिकाणी उमेदवार देणार नाही. आगामी काळात सत्ता आल्यानंतर आम्ही त्यांना सत्तेत वाटा देऊ तसेच त्यांच्यासह काही नेत्यांना कॅबिनेट देऊ. आणखी काय सहकार्य हवे आहे? असेही अखिलेश यादव यांनी म्हटले.

प्रगतीशिल समाजवादी पक्षाचे अध्यक्ष शिवपाल यादव यांनीही या पूर्वी आघाडीची भाषा केली आहे. विधानसभा निवडणूक 2017 पूर्वी अखिलेश यादव आणि शिवपाल यांच्यात झालेल्या तीव्र संघर्षानंतर शिवपाल यांनी समाजवादी पक्षातून बाहेर पडत स्वत:चा वेगळा पक्ष काढला होता.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणूक निकालावरही अखिलेश यादव यांनी भाष्य केले आहे. बिहारमध्ये जनमत महागठबंधन (राजद, काँग्रेस) यांच्या बाजूने होते. परंतू, दगाफटका करुन एनडीएने विजय मिळवला आहे. जेवढे एक्झिट पोल्स आले त्या सर्वांनी आपला कौल महागठबंधनच्या बाजूनेच दिला होता. परंतू, मतमोजमी थांबविण्यात आली आणि विजयाची प्रमाणपत्रे भलत्याच उमेदवारांना देण्यात आली.