Rahul Gandhi On Rajiv Gandhi: 'पापा, आप मेरे साथ ही हैं', राजीव गांधी यांच्या आठवणीत राहुल गांधी भावूक; सोशल मीडियावर शेअर केला Video
Rahul Gandhi shares photo with Sonia Gandhi (PC - Twitter/Rahul Gandhi)

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आपले वडील माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या आठवणीत भावूक झाले आहेत. राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी (Rajiv Gandhi Death Anniversary) आहे. त्यानिमित्त राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसबत त्यांनी मोजक्याच एक पोस्टही लिहीली आहे. राहुल यांनी पीता राजीव यांच्यासाठी हिंदीत लिहिलेल्या पोस्टचा मराठी भावार्थ असा की, 'पापा, आपण माझ्या सोबतच आहात, एका प्रेरणेच्या रुपात, आठवणींमध्ये, सदैव!'. राहुल गांधी यांच्या या पोस्टला अनेकांनी प्रतिसाद दिला असून, ट्विटरवर अनेकांनी ही पोस्ट लाईक आणि शेअर केली आहे. तसेच, त्याखाली प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राजीव गांधी यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे प्रसंग आणि काही क्षणचित्रांचा समावेश आहे. ज्यात राजीव गांधी यांची कारकीर्द आणि त्यांच्या अंत्यत्रेच्या काही क्षणांचा समावेश आहे. आपणही खाली दिलेल्या व्हिडिओवरुन हा प्रसंग पाहू शकता. जो राहुल गांधी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला आहे. (हेही वाचा, Rajiv Gandhi Assassination Case: राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींच्या सुटकेला काँग्रेसचा आक्षेप; सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार पुनर्विचार याचिका)

दरम्यान, संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी रविवारी सकाळी येथील वीर भूमी येथे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या 32 व्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पांजली वाहिली. या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही गांधी परिवारासोबत उपस्थित राहून त्यांना आदरांजली वाहिली.

व्हिडिओ

राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी झाला. त्यांनी उत्तर प्रदेशच्या अमेठी लोकसभा मतदारसंघाचे चार वेळा प्रतिनिधित्व केले. भारतरत्न प्राप्तकर्ते, राजीव गांधी यांनी 1984 ते 1989 पर्यंत भारताचे सहावे पंतप्रधान म्हणून काम केले. 1984 मध्ये त्यांची आई, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांनी पदभार स्वीकारला. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. 21 मे 1991 रोजी तामिळनाडूच्या श्रीपेरुंबदुर येथे एका निवडणूक रॅलीदरम्यान लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) च्या आत्मघातकी बॉम्बरने राजीव गांधींची हत्या केली. यमुना नदीच्या काठावर असलेल्या वीर भूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.