Online Gaming Dispute: ऑनलाइन गेम खेळण्यापासून रोखल्याने तरुणाने केली आई-वडील व बहिणीची हत्या; ओडिशामधील धक्कादायक घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री 3 वाजता जगतसिंगपूर पोलीस स्टेशन हद्दीतील जयबाडा सेठी साही येथे घडली. मंगळवारी सकाळी, जेव्हा सूरजकांतच्या कुटुंबीयांनी त्याला मोबाईल फोनवर गेम खेळण्यापासून रोखले, तेव्हा त्याने त्यांना दगडांनी वार करून ठार मारले.
आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन गेम्स (Online Gaming) तरुणांची पहिली पसंती बनत आहेत. मात्र, जास्त ऑनलाईन गेम्समुळे मानसिक ताण, अभ्यासात घट आणि आक्रमक वर्तन यासारख्या समस्या देखील उद्भवत आहेत. ओडिशातील जगतसिंहपूर जिल्ह्यातूनही असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने त्याच्या पालकांची आणि बहिणीची हत्या केली आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले की, आरोपी सूरजकांत याला मोबाईल फोनवर ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन होते आणि त्याचे वडील प्रशांत सेठी आणि आई कनकलता त्याला अनेकदा गेम खेळण्यापासून रोखत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री 3 वाजता जगतसिंगपूर पोलीस स्टेशन हद्दीतील जयबाडा सेठी साही येथे घडली. मंगळवारी सकाळी, जेव्हा सूरजकांतच्या कुटुंबीयांनी त्याला मोबाईल फोनवर गेम खेळण्यापासून रोखले, तेव्हा त्याने त्यांना दगडांनी वार करून ठार मारले. त्या तरुणाने त्याची 25 वर्षीय बहीण रोझलिन सेठी हिचीही हत्या केली आणि नंतर घर सोडून गावात लपून बसला. नंतर त्या तरुणाला अटक करण्यात आली. मात्र, आरोपीची मानसिक स्थिती चांगली नसल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.
एकाच कुटुंबातील तीन जणांच्या हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांसोबत फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आणि पुरावे गोळा केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत आणि ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. सूर्यकांतने कबूल केले आहे की, त्याने त्याच्या पालकांची हत्या केली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. (हेही वाचा: MP Shocker: इंदूर येथे शेव न दिल्यामुळे 30 वर्षीय तरुणाची चाकूने भोकसून हत्या)
दरम्यान, अलिकडेच सेपियन लॅब्सने ‘द युथ माइंड: राईजिंग अॅग्रेशन अँड अँगर’ नावाचा एक अभ्यास केला आहे. या अभ्यासात भारत आणि अमेरिकेतील 13-17 वयोगटातील मुलांबद्दल चर्चा केली आहे. लहान वयातच जेव्हा मुले स्मार्टफोन वापरायला लागतात तेव्हा त्यांच्या मानसिक आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो, हे या अभ्यासातून समोर आले आहे. विशेषतः, स्मार्टफोनच्या अति वापरामुळे मुलांमध्ये आक्रमकता, राग आणि चिडचिडेपणा वाढत आहे. या बदलांमुळे त्यांच्या मानसिक आरोग्याची चिंता वाढत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 05, 2025 04:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

