Nirbhaya Rape Case: दोषींची फाशी आणखीन लांबणार! केंद्र सरकारच्या याचिकेवर 11 फेब्रुवारीला पुढील सुनावणी
Nirbhaya Case Convicts (Photo Credits: File Image)

देशातील बहुचर्चित निर्भया बलात्कार खटल्यात (Nirbhaya Gangrape Case) दोषी आढळून सुद्धा चारही गुन्हेगारांची फाशी लांबणीवरच पडत आहे. या प्रकरणात केंद्र सरकारने (Central Government) केलेल्या याच्यावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी घेण्यात आली मात्र यातही निर्णय होऊ न शकल्याने पुढील सुनावणी 11 फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. निर्भयाच्या दोषींना सुनावण्यात आलेली शिक्षा पुढे ढकलण्यासाठी वारंवार विविध याचिका दाखल केल्या जात आहेत, परिणामी निर्णय आणि फाशी लांबणीवर पडत आहे. मात्र ज्यांची याचिका फेटाळून आता फाशीचा मार्ग मोकळा झालाय त्यांना स्वतंत्र रित्या फाशी देण्यात यावी अशी याचिका तिहार जेल प्रशासन व केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्यावर या निर्णयाच्या विरुद्ध केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायलायत धाव घेत याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी झाली मात्र न्यायालय अद्याप निर्णयावर पोहचू शकलेले नाही.

ANI ट्वीट

निर्भयाच्या प्रकरणात निर्णयाला उशीर होत असल्याने निर्भयाचे आई आशादेवी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे, काही दिवसांपूर्वी, या संदर्भात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी प्रतिक्रिया देत असे सुरु राहिल्यास या प्रकरणात कधीच निर्णय येणार नाही आणि हा खटला असाच इतिहासात जमा होईल असे म्हंटले होते.

आतापर्यंत दोषी, अक्षय ठाकूर, मुकेश आणि विनय यांची दया याचिका राष्ट्रपतींकडून फेटाळण्यात आली होती, तर पवनने सर्वोच्च न्यायालयात गुन्हा घाडेच्यावेळी आपण अल्पवयीन असल्याचे सुनावणी दरम्यान दुर्लक्षित केले गेले होते असे म्हणत पुनर्विचार याचिका दाखल केली होती. याप्रकरणी अंतिमतः काय निर्णय होती हे पाहण्यासाठी आता पुन्हा 11 फेब्रुवारी पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. हे चार दोषी - मुकेश कुमार सिंह, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय कुमार सध्या तिहार तुरुंगात कैद आहेत.