मध्यप्रदेश: महाराष्ट्रातून इंदोर येथे जाण्यासाठी निघालेल्या 4 स्थलांतरित कामगारांना ट्रकची जोरदार धडक बसल्याने मृत्यू
Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहे. परंतु लॉकडाउनच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांना उत्पन्नाचे कोणतेच साधन नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे स्थलांतरित कामगार आणि मजूरांनी आपल्या घरी जाण्याची वाट पकडली आहे. बहुसंख्येने कामगारवर्ग पायी चालत जाताना दिसून येत आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून स्थलांतरित कामरांसोबत अपघाताच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे. तर आता महाराष्ट्रातून इंदोर येथे जाण्यासाठी निघालेल्या 4 स्थलांतरित कामगारांना ट्रकची जोरदार धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

स्थलांतरित कामगार इंदोरकडे जाण्यासाठी निघाले होते. मात्र ट्रकच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये एक स्थलांतरित कामगार आणि त्याची बायकोसह अन्य दोन जणांना आपला जीव गमवाला लागला आहे. स्थलांतरित कामगारांसोबत हा अपघात मध्य प्रदेशातील भरवनी येथे घडला आहे.(Coronavirus Update in India: भारतात महाराष्ट्र पाठोपाठ या '2' राज्यांमधील कोरोना बाधितांची संख्या 10,000 च्या पार, पाहा राज्यनिहाय ताजे अपडेट्स)

दरम्यान, स्थलांतरिक मजूर आणि कामगारांना आपल्या घरी जाता यावे यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच केंद्राने मजूरांना त्यांच्या जिल्ह्यात पाठवण्यासाठी स्पेशल ट्रेन सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत दीड लाखांपेक्षा अधिक कामगारांनी श्रमिक स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून प्रवास केला आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत बोलायचे झाल्यास त्याचा आकडा 25 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी आता तरीही लॉकडाउनच्या काळात घरीच थांबावे असे वारंवार सांगण्यात येत आहे.