Congress Against Farm Law: शेतकरी कायद्याविरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा मोर्चा; दिल्ली पोलिसांनी नाकारली परवानगी, कलम 144 लागू
Rahul Gandhi | (Photo Credits: ANI)

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) काँग्रेस पक्ष (Congress Party) आक्रमक झाला आहे. काँग्रेस पक्षाने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील विजय चौक (Vijay Chowk) ते राष्ट्रपती भवनावर (Rashtrapati Bhavan) मोर्चा काढण्याची रणनिती आखली आहे. परंतू, कोरोना व्हायरस संकटाचे कारण देत दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. मात्र, राहुल गांधी आणि काही निवडक लोकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दिल्ली पोलीस दलाचे अतिरिक्त डीसीपी दीपक यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, काँग्रेस नेत्यांना राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढण्यास परवानगी देण्यात आली नाही. मात्र, काँग्रेस पक्षाच्या 3 नेत्यांना राष्ट्रपतींना भेटण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढण्यासाठी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर दिल्ली येथील काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयासमोर जमले आहेत. परंतू, दिल्ली पोलिसांनी या परिसरात कलम 144 लागू केले आहे. (हेही वाचा, Farmer's Protest: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 27 डिसेंबरला असणारी 'मन की बात' संपेपर्यंत प्रत्येकाने थाळ्या वाजवाव्यात, शेतकरी संघटनेचे आवाहन)

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी काँग्रेस मुख्यालयात पोहोचले आहे. येथे त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी मोर्चाबाबत चर्चा केली. कृषी कायद्याविरोधात सुमारे 2000 शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांचे कागद असलेले 2 ट्रकही कँग्रेस कार्यायात पोहोचले आहेत. या स्वाक्षरांची पत्रही राष्ट्रपतींकडे सोपवली जाणार आहेत.

राष्ट्रपती भवनाकडे घेऊन जाण्यासाठी दोन ट्रक काँग्रेस मुख्यालयात सज्ज ठेवण्यात आले आहेत. यात असलेली शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यंची पत्रं काँग्रेस राष्ट्रपती कोविंद यांना देऊ इच्छित आहे. राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा नेण्यासाठी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारीही केली आहे. कार्यकर्तेही जमले आहेत. परंतू, काँग्रेस मुख्यालयात कलम 144 लागू केल्यामुळे आणि मोर्चास परवानगी नाकारल्यामुळे पुढे काय होते याबाबत उत्सुकता आहे.