हैदराबाद: आज अब्दुल करीम टुंडाला, 1998 साली देशातील अनेक भागांत झालेल्या बॉम्ब-स्फोटांच्या कट रचल्याबद्दल निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. मेट्रोपॉलिटन सेशन जज कोर्ट (जेएमसी) नामल्ली, हैदराबादने टुंडाला सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले.

सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसमुळे मुंबई विमानतळावर आजपर्यंत 551 विमानातील, 65,621 प्रवाश्यांची तपासणी करण्यात आली आहे. राज्यात कोरोना व्हायरस प्रभावित भागातून 401 प्रवासी येत आहेत. तसेच या आजाराची लक्षणे आढळल्याने 152 जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते, पैकी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे यांच्या अहवालानुसार 149 जणांची तपासणी नकारात्मक आली असून, तीन जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

आजपासून 10 वीची परीक्षा सुरु झाली.जळगाव जिल्ह्यातील कुऱ्हा येथे मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटीबाबत वृत्त प्रसिध्द झाले होते. याविषयी विभागीय सचिवांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला आहे. त्यानुसार कोणत्याही प्रकारची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे नमूद केले आहे. प्रश्नपत्रिका फुटीचे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.

जयपूरमध्ये 69 वर्षीय इटलीच्या पर्यटकाला कोरोनाची लागण झाली आहे. इटलीतील 20 पर्यटकांचा एक गट जयपूर येथे फिरण्यासाठी आला होता. त्यावेळी यातील एका पर्यटकाची प्रकृती बिघडली. त्याला ताप आणि श्वसनाला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्ताच्या नमुन्याच्या तपासणीनंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  

खडकवासला मधील कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कैलास चव्हाण हे खडकवासला येथे पोहण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांचा अचानक तोल गेला. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या पत्नीने  पाण्यात उडी घेतली. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. 

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 'महाराष्ट्र विकास हाच धर्म' म्हणत आदित्य ठाकरे यांचे आभार मानले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी आदित्य ठाकरे यांचे ट्विट रिट्विट केले आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून जितेंद्र आव्हाड यांचा अधिवेशनातील एक व्हिडिओ शेअर केला आहे.

झारखंडमध्ये 6 वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोस्को कोर्टाने दोषींना 4 दिवसांत फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.  

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोना व्हायरसच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. सोशल मीडिया अकाउंटवर विदुषकी खेळ खेळून भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

बीड जिल्ह्यात आठवीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.  एक महिन्यांपासून पीडित मुलगी बेपत्ता होती. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. तसेच आरोपीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याचे संशयित  जबाबदार वडील-मुलीला NIA कडून अटक करण्यात आली आहे.

Load More

आज, 3 मार्च पासून महाराष्ट्रात दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होत आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा 9 विभागीय मंडळांमध्ये घेतली जाणार आहे. यंदा राज्यभरातून तब्बल 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यापैकी 9,75,894 विद्यार्थी तर 7,89,898 विद्यार्थीनी आहेत.

दुसरीकडे,काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सहित सोशल मीडियाला रामराम ठोकण्याच्या विचारात आहोत आणि याबाबत आपण येत्या रविवारी आपला निर्णय मांडणार आहोत असे ट्विट केले होते,यावरून आजही सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत. मोदींच्या या निर्णयाच्या बाबत सामान्य नागरिकांपासून ते राजकारणी मंडळींपर्यंत सर्वच याबाबत तर्कवितर्क लावताना दिसत आहेत. तसेच मोदींच्या पाठोपाठ आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुद्धा आपण सोशल मीडिया सोडणार असल्याचे संकेत दिले आहेत.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

दरम्यान, आज 3 मार्च रोजी दिल्ली सामूहिक बलात्कार खटल्यातील दोषींना दिली जाणारी फाशी आता पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे, दोषी पवन कुमार गुप्ता याची दया याचिकेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून अजूनही निर्णय देण्यात आली नसल्याने दिल्ली पटियाला कोर्टाकडून या फाशीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. या वरून देशभरात संताप व्यक्त केला जात आहे