Corona Update: भारतात कोरोना विषाणूचे थैमान; गेल्या 24 तासात 29 लोकांचा मृत्यू, तर 1 हजार 463 नव्या रुग्णांची नोंद
COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगासह भारताला (India) हादरून टाकले आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या भारतातही कोरोनाचे जाळे अधिक वेगाने पसरत असल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत. भारतात गेल्या 24 तासांत एकूण 1 हजार 463 नव्या रुग्णांची भर पडली असून कोरोनामुळे 29 लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची माहिती दिली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातच कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण भारतात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, कोरोना विषाणूचे जाळे पसरत चालत असल्यामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

जगभरात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 16 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 3 लाखांहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 10 हजार 363 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 339 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 हजार 36 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 2 हजार 455 वर पोहचली आहे. यात 160 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 208 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus Lockdown: आता 8 तासांच्या ऐवजी 12 तासांची शिफ्ट होण्याची शक्यता; 1948 च्या कायद्यात बदल करण्याचा केंद्र सरकारचा विचार

एएनआयचे ट्वीट-

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.