झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका 30 मार्चपासून पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Swarajyarakshak Sambhaji (Photo credit : Zee5)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून सर्व चित्रपट, मालिकांचे शूटिंग रद्द करण्यात आले आहेत. यामुळे अनेक वाहिन्या मालिकांचे Repeated भाग दाखवत आहेत. अशा वेळी डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी आनंदाची बातमी सांगितली आहे. लोकांच्या मनात घर करुन राहिलेली झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' (Swarajya Rakshak Sambhaji) ही मालिका पुन्हा सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. लोकांच्या मनावर अधिराज्य करणारी रामायण, महाभारत या ऐतिहासिक मालिका पुन्हा सुरु झाल्यानंतर आता महाराष्ट्रातून अनेकांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे "स्वराज्यरक्षक संभाजी"मालिका पुन्हा प्रसारित करावी.. या मागणी केली होती.

लोकांच्या आग्रहास्तव आणि लोकांचे या मालिकेवर असलेले प्रेम पाहून ही मालिका 30 मार्चपासून म्हणजेच उद्यापासून पुर्नप्रक्षेपित केली जाणार आहे. उद्यापासून रोज संध्याकाळी 4 ते 8 या वेळेत ही मालिका झी मराठी वाहिनीवर दाखविली जाणार आहे. लॉकडाऊनच्या काळात आपली आवडती मालिका पुन्हा पाहायला मिळणार असल्यामुळे प्रेक्षकही खूप खूश आहेत. 'रामायण' मालिकेचे पुर्नप्रक्षेपण उद्यापासून सुरु होणार- प्रकाश जावडेकर

यासंदर्भात या मालिकेतील मुख्य संभाजी ची भूमिका करणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली आहे. त्यासोबतच "लॉक डाऊन चा हेतू साध्य होण्यासाठी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेची मदत होईल.", असेही त्यांनी म्हटले आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी यांची भूमिका, तसेच शंतनू मोघे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि प्राजक्ता गायकवाडने साकारलेली येसुबाईंची भूमिका यांनादेखील प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळाले.