The Kapil Sharma Show मधील Sumona Chakravarti ने व्यक्त केले दुःख-'मी बेरोजगार असून गेल्या 10 वर्षांपासून गंभीर आजाराने ग्रस्त आहे' (See Post)
Sumona Chakravarti (Photo Credits: Instagram)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथीने जगातील जवळजवळ सर्व देशांना प्रभावित केले आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे जीवन पूर्णतः बदलून गेले आहे. मुख्यत्वे लोकांच्या आर्थिक विवंचना फार वाढल्या आहेत. टीव्ही तसेच चित्रपट क्षेत्रातील लोकही याला अपवाद नाहीत. याकाळात अनेकांचे काम बंद आहे. नुकतेच श्रुती हासनने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले होते. आता कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) मध्ये काम करणाऱ्या सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti) हिने सोशल मीडियावर स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. आपण बेरोजगार असून एका गंभीर आजाराने ग्रासले असल्याचे तिने सांगितले आहे. सुमोनाने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहून सध्याच्या काळातील आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

'द कपिल शर्मा शो'मधील भुरी किंवा मंजू म्हणजेच सुमोना चक्रवर्तीने तिच्या विविधांगी पात्रांनी नेहमीच लोकांच्या मनावर राज्य केले आहे. पण सुमोना चक्रवर्ती गेल्या वर्षापासून टीव्ही पडद्यावरुन गायब आहे. आता तिने आपण बेरोजगार असल्याचे सोशल मीडियावर सांगितले आहे. आपल्या पोस्टमध्ये सुमोनने माहिती दिली आहे की, गेल्या 10 वर्षांपासून तिला एंडोमेट्रिओसिस (Endometriosis) नावाच्या आजाराने ग्रासले आहे, ज्याच्या चौथ्या स्टेजवर ती आहे. सुमोनाने पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'मी कोणत्याही सोशल मिडियावर याबद्दल बोलले नाही. लॉकडाउन माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या कठीण आहे.’

(हेही वाचा: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मालिकेतील 'टप्पू' उर्फ Bhavya Gandhi याची वडीलांसाठी भावूक पोस्ट)

ती म्हणते, 'मी आज घरी वर्कआउट केला. काही दिवस माझ्या मनात गिल्ट होती, कारण कधीकधी कंटाळा प्रिव्हीलेज आहे. सध्या भलेही मी बेरोजगार असेन पण आपल्या परिवाराचे पोट भरू शकते.’ पुढे तिने आपला आजार, व त्याबाबतच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणते, ‘या सर्व गोष्टी सांगणे माझ्यासाठी सोपे नव्हते, परंतु प्रत्येक चकाकणारी गोष्ट हे सोने नसते. जर ही पोस्ट एखाद्या तरी व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आणू शकेल किंवा एखाद्याला प्रेरणा देऊ शकेल तर ते माझ्यासाठी पुरेसे असेल. प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील कोणत्या ना कोणत्या समस्येशी झगडत असतो. मात्र यामध्ये आपल्याला गरजेचे आहे ते प्रेम, सद्भावना आणि दयाळूपणा.’