Kulbhushan Jadhav Case: ICJ कोर्टात पाकिस्तानचे भारतावर खोटे आरोप; कुलभूषण जाधव दोषी असल्याचा दावा

पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणाची आज आंतरराष्ट्रीय न्यायालयातील सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे.

Kulbhushan Jadhav Case: ICJ कोर्टात पाकिस्तानचे भारतावर खोटे आरोप; कुलभूषण जाधव दोषी असल्याचा दावा
Kulbhushan Jadhav Case in ICJ | (Photo Credit-ANI)

Kulbhushan Jadhav Case in ICJ: पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) प्रकरणाच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयातील (International Court of Justice) सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. गुरुवार, 21 फेब्रुवारीपर्यंत ही सुनावणी सुरु राहील. या प्रकरणी भारताने काल (सोमवार, 18/2/2019) आपली बाजू मांडली. तर आज पाकिस्तानने आपली बाजू सादर केली. या प्रकरणी पाकिस्तानने सांगितले की, "आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या विषयी प्रमुख प्रश्न उपस्थित केले होते. मात्र भारताने त्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत."

अटॉर्नी जनरल अनवर मंसूर खान यांनी पाकिस्तानची बाजू सादर केली. आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव प्रकरणाविषयी त्यांनी सांगितले की, "कुलभूषण जाधव हे भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ चे अधिकारी असून ते भारताच्या आदेशावरुन बलूचिस्तानात दहशतवादी हल्ला करण्याचे उद्देशाने आले होते." तसंच या गोष्टी खुद्द जाधव यांनी मान्य केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.

तसंच ते पुढे म्हणाले की, "भारत नेहमीच पाकिस्तानला खालचा दर्जा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी भारत त्यांच्या पारंपारीक पद्धतीचा वापर करत असतो. इतकंच नाही तर भारत देश अत्यंत क्रुर असून मी स्वतः अनेकदा या क्रुरतेचा बळी झालो आहे. पाकिस्तानाच्या युवा आर्मीचा ऑफिसर असताना मी बंदीवासात राहिलो आहे. भारताने अनेकदा जिनेव्हा कन्व्हेन्शनचे उल्लंघन केले आहे."

मंसूर खान इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पेशावर हल्ल्यात भारत दोषी असल्याचेही आरोप केले. हा हल्ला भारताने अफगाणिस्तानशी हात मिळवणी करुन केला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. 2014 मध्ये पेशावर येथील शाळेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 140 विद्यार्थ्यांनी प्राण गमावले होते.

भारतावर सातत्याने खोटे आरोप करताना खान पुढे म्हणाले की, "भारत इतर देशांची हातमिळवणी करुन पाकिस्तानात अशांती पसरवण्याचा प्रयत्न करत असतो. तरी देखील पाकिस्तानची वागणूक नेहमीच सौम्य राहिली आहे. कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना देखील पाकिस्तानने भेटण्याची परवानगी दिली होती. भारताने कधी पाकिस्तानी कैद्यांसोबत अशी वर्तवणूक केली आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला."

(The above story first appeared on LatestLY on Feb 19, 2019 05:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).