Xiaomi ने बंद केला भारतातील आपला व्यवसाय; लाखो लोक होऊ शकतात प्रभावित, जाणून घ्या सविस्तर
Xiaomi (संग्रहित संपादित प्रतिमा)

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने भारतीय बाजारपेठेतील आपला आर्थिक व्यवसाय बंद केला आहे. कंपनीने अद्याप याची पुष्टी केलेली नसली तरी, रिपोर्टनुसार, Xiaomi ने Mi Pay आणि Mi Credit अॅप्स आपल्या App Store आणि Google Play Store वरून काढून टाकले आहेत. टेकक्रंच या इंग्रजी टेक साइटने याबाबत माहिती दिली आहे. Mi Pay तीन वर्षांपूर्वी लॉन्च करण्यात आले होते.

Mi Pay अॅपद्वारे, वापरकर्ते पैसे ट्रान्सफर करू शकतात तसेच इतरही सर्व प्रकारची पेमेंट करू शकतात. Mi Pay अॅप नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) अॅप्सच्या यादीतूनही गायब झाले आहे. सध्या भारतात Xiaomi विरोधात टॅक्सबाबत चौकशी सुरू आहे. या प्रकरणावर भाष्य करताना, Xiaomi इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘आम्ही इतर मुख्य व्यवसाय सेवांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मार्च 2022 मध्ये Mi Financial Services बंद केली.’

ते पुढे म्हणाले, ‘4 वर्षांच्या अल्प कालावधीत, आम्ही हजारो ग्राहकांना जोडण्यात आणि त्यांना समर्थन देण्यात सक्षम झालो. आम्ही आमच्या भागीदारांसोबत काम करत आहोत आणि या प्रक्रियेदरम्यान आमच्या ग्राहकांना पाठिंबा देत आहोत. आम्ही आमची उत्पादने आणि सेवांसह भविष्यात प्रत्येकासाठी नवीनतम तंत्रज्ञान आणि नावीन्य आणत राहू.’ (हेही वाचा:  जगातील टॉप-100 मौल्यवान ब्रँड्समध्ये फक्त एका भारतीय कंपनीचा समावेश; Apple चे वर्चस्व कायम (See List))

Xiaomi ची भारतातील बँक खाती गोठवण्यात आली असून, ही जवळपास 5,500 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. या प्रकरणी Xiaomi ने कर्नाटक हायकोर्टातही संपर्क साधला होता, पण कोर्टाने सुनावणीस नकार दिला. Xiaomi विरुद्ध फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (FEMA) अंतर्गत खटला सुरू आहे. काही दिवसांपूर्व एक अहवाल देखील आला होता ज्यामध्ये असे म्हटले होते की, Xiaomi आपला उत्पादन व्यवसाय भारतातून पाकिस्तानात हलवू शकते. मात्र हा दावा Xiaomi ने पूर्णपणे फेटाळून लावला होता आणि ही केवळ अफवा असल्याचे म्हटले होते.