
IND vs SL Asia Cup Super 4: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया कप २०२५ मध्ये आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत अभिषेक शर्माची फलंदाजी आणि कुलदीप यादवच्या गोलंदाजीची सर्वाधिक चर्चा होत आहे. टीम इंडियाने फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले असले तरी, त्यांना सुपर-४ मध्ये अजून एक सामना खेळायचा आहे. आज, २६ सप्टेंबर रोजी दुबईच्या मैदानावर त्यांचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ फायनलपूर्वी आपल्या कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करेल, विशेषतः बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात मधल्या फळीतील फलंदाजांची निराशाजनक कामगिरी संघासाठी चिंतेचा विषय बनली आहे.
सलामीवीर दमदार, पण मधली फळी चिंतेचा विषय
आशिया कप २०२५ मध्ये टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अभिषेक शर्माच्या आक्रमक फलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण झाला आहे, तर शुभमन गिलनेही फलंदाजीमध्ये चांगली साथ दिली आहे. मात्र, संघाची मधली फळी अजूनही अपेक्षित कामगिरी करू शकलेली नाही. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा स्कोर २०० धावांच्या पुढे जाईल असे वाटत असताना, अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज एकामागे एक लवकर बाद झाले. त्यामुळे, आज श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सुपर-४ च्या सामन्यात मधल्या फळीतील फलंदाजांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.
श्रीलंकेविरुद्ध भारताचा एकतर्फी रेकॉर्ड
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचा श्रीलंकेविरुद्धचा रेकॉर्ड एकतर्फी आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण ३१ सामने खेळले गेले असून, त्यात टीम इंडियाने २१ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दुसरीकडे, श्रीलंकेला केवळ ९ सामन्यांतच विजय मिळाला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. टी-२० आशिया कपमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत २ सामने झाले आहेत, ज्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ सामना जिंकला आहे.