IND vs NZ 2nd ODI: न्यूझीलंडचा ऑकलँडमध्ये 22 धावांनी विजय, टीम इंडियाविरुद्ध वनडे मालिकेत घेतली 2-0 अशी आघाडी
(Photo Credit: Twitter/ICC)

टीम इंडियाविरुद्ध ऑकलँड (Auckland) मधील दुसऱ्या वनडे सामन्यात यजमान न्यूझीलंडने (New Zealand) 22 धावांनीं विजय मिळवला. टॉस गमावून पहिले फलंदाजी करत किवी संघाने दिलेल्या 274 धावांच्या प्रत्युत्तरात भारताला (India) 251 धावांपर्यंतच मजल मारता आली. टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या टीम इंडियाने आज फलंदाजीने निराश केले. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि जडेजाला वगळता अन्य कोणताही फलंदाजाला धावा करण्यात यश मिळाले नाही. श्रेयसने सर्वाधिक 52 धावा केल्या, पण मोठा डाव खेळू शकला नाही. न्यूझीलंडकडून कॉलिन डी ग्रैंडहोम, टिम साउथी, काइल जैमिसन (Kyle Jamieson) आणि हामिश बेनेट यांनी सर्वाधिक प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर जेम्स निशाम याला 1 विकेट मिळाली. भारतीय फलंदाजांनी आज अत्यंत निराशाजनक कामगिरी केल्याने न्यूझीलंडने 3 सामन्यांची मालिका 2-0 ने खिशात घातली. (IND vs NZ 2nd ODI: हेन्री निकोल्स ला Time-Out झाल्यावरही रिव्यू दिल्याने संतप्त विराट कोहली याने मैदानावर घातला अंपायरशी वाद)

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. अशा परिस्थितीत पहिले बॅटिंग करत न्यूझीलंडने 50 षटकांत फलंदाजी करत 8 विकेट गमावून 273 धावा केल्या. किवी संघाकडून सलामी फलंदाज मार्टिन गप्टिलने 79, रॉस टेलरने नाबाद 73, हेंद्रू निकोल्सने 41, जैमिसनने नाबाद 25 आणि टॉम ब्लंडेलने 22 धावा केल्या. भारताकडून युजवेंद्र चहलने 3, शार्दुल ठाकूरने 2 आणि रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली. दुसरीकडे, फलंदाजीत टीम इंडियाकडून श्रेयस 52, मयंक अग्रवाल 3, पृथ्वी शॉ 24, विराट कोहली 15, केएल राहुल 4, केदार जाधव 9, रवींद्र जडेजा 55, शार्दूल ठाकूर 28, नवदीप सैनीने 45 धावा केल्या. जडेजाने आज पुन्हा एकदा न्यूझीलंडविरुद्ध एकाकी झुंज दिली आणि चाहत्यांना त्याच्या मागील वर्षीच्या विश्वचषक दरम्यानच्या डावाची आठवण करून दिली.  एक वेळी न्यूझीलंडचा विजय निश्चित असताना रवींद्र जडेजा याच्या संघर्षपूर्ण अर्धशतक केला आणि भारताच्या आशा जिवंत ठेवल्या, पण निशामने अखेरीस जडेजाला 55 धावांवर डी ग्रैंडहोमकडे कॅच आऊट केले.

यानंतर आता दोन्ही देशांमध्ये तिसरा आणि अंतिम वनडे सामना 11 फेब्रुवारी रोजी, माउंट मॉनगनुईच्या बे ओवल मैदानात खेळला जाईल. टीम इंडियामध्ये क्लीन स्वीप टाळण्याच्या प्रयत्नासह मालिकेत पहिला विजय नोंदवू इच्छित असेल.